Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History: क्रिकेट सामन्यांमध्ये एखादा फलंदाज त्रिशतक झळकावताना पाहण्याचा क्षण क्वचित कधीतरी येतो. पण रणजी ट्रॉफी सामन्यात गोव्याच्या एक नव्हे तर दोन्ही फलंदाजांनी एकाच डावात त्रिशतक झळकावली आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाने प्लेट गट सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना हा अनोखा विक्रम केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरूणाचल प्रदेश वि गोवा या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाज कश्यप बाकले आणि स्नेहल कौठणकर या फलंदाजांनी त्रिशतकं करत क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली आहे. पोर्वोरिम येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी गोवा संघाने अरुणाचल प्रदेशला पहिल्या डावात अवघ्या ८४ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात गोव्याने कश्यप बकळे आणि स्नेहल कवठणकर यांच्या त्रिशतकांच्या जोरावर स्कोअरबोर्डवर ७०० हून अधिक धावा जोडल्या.

हेही वाचा – IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…

गोवा संघाने पहिल्या डावात २ बाद ७२७ धावा करत डाव घोषित केला. यादरम्यान कश्यप बकळे ३०० धावा करून नाबाद माघारी परतला, तर स्नेहल कवठणकर ३१४ धावा करून नाबाद माघारी परतला. अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला.

रणजीमधील यापूर्वी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे आणि अंकित बावणे यांच्या नावावर होता. या दोघांनी २०१६ मध्ये दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी ५९४ धावांची भागीदारी केली होती. कश्यप बकळे आणि स्नेहल कवठणकर यांनी अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या प्लेट ग्रुप सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६०६ धावांची भागीदारी केली. अशा प्रकारे, रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी म्हणून रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली.

हेही वाचा – Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल

स्नेहल कौठणकरने अवघ्या २०५ चेंडूत त्रिशतक झळकावले, जे प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे. त्याचवेळी कश्यप बकळे हा प्रथम श्रेणी इतिहासात भारताकडून तिसरा जलद त्रिशतक करणारा फलंदाज ठरला. स्नेहलने २१५ चेंडूंत ४५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३१४ धावा केल्या, तर कश्यप बकलेने २६९ चेंडूंत ३९ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३०० धावा केल्या. याशिवाय प्रभुदेसाईने ७३ धावांचे योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy goa batters 606 runs highest ever partnership in 90 year old history kashyap bakle and snehal kauthankar triple centuries bdg