Ranji Trophy Semifinal Kerala vs Gujarat: रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात केरळने अचंबित करणारा विजय मिळवत ७४ वर्षांनंतर रणजीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. केरळ संघाने गुजरात विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पाचव्या दिवशी पहिल्या डावाच्या आधारे २ धावांची आघाडी घेत अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात गुजरातला २ धावांची गरज असताना झेलबादने मिळालेली विकेट पाहून सर्वच जण चकित झाले.

केरळ संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली ज्यात त्यांनी पहिल्या डावात ४५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ पहिल्या डावात ४५५ धावा करू शकला. या सामन्यात गुजरात संघाची शेवटची विकेट अर्जन नागवासलाच्या रूपात पडली, पण ही विकेट पाहून मैदानावरील पंचांमध्येही गोंधळ उडाला पण शेवटी त्यांनी झेलबाद असल्याचा निर्णय दिला.

फिल्डरच्या डोक्याला चेंडू लागला अन्….

गुजरातला विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि केरळला विजय मिळवण्यासाठी १ अखेरची विकेट हवी होती. इतक्यात गुजरात संघाकडून खेळत असलेल्या अर्जन नागवासला याने केरळ संघाचा फिरकीपटू आदित्य सरवटेच्या फुल लेन्थ चेंडूवर ड्राईव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात चेंडू थेट शॉर्ट लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या सलमान नजीरच्या हेल्मेटला लागला, तो चेंडू येऊन धडकणार हे कळताच खाली वाकून वाचायला पाहत होता.

चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला आणि हवेत गेला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या सचिन बेबीने तो सोपा झेल टिपला. मात्र, या झेलनंतर मैदानावरील पंचांनी काही वेळ आपापसात चर्चा केली आणि नंतर नियमानुसार झेलबाद असल्याचा इशारा केला. हा निर्णय केरळ संघासाठी निश्चितच ऐतिहासिक मानला जात आहे, कारण खेळाच्या पाचव्या दिवशी ही घटना घडली, यासह केरळचा संघ पहिल्या डावातील २ धावांच्या आघाडीसह अंतिम फेरीत पोहोचला.

या सामन्यात जलज सक्सेना आणि आदित्य सरवटे यांनी केरळ संघासाठी उपांत्य फेरीच्या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार कामगिरी केली, ज्यात जलजने ४ विकेट घेतले आणि आदित्यने देखील ४ विकेट घेण्यात यश मिळवले. याशिवाय केरळकडून निदेश आणि बासिलने १-१ विकेट घेतली. केरळ संघ रणजी ट्रॉफीच्या ७४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

Story img Loader