मुंबई : चांगल्या सुरुवातीनंतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ब-गटाच्या सामन्यात मुंबईवर पराभवाचे सावट आहे. सौराष्ट्रने दिलेल्या २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद २१८ अशी स्थिती होती. विजयासाठी मुंबईला आणखी ६२ धावांची, तर सौराष्ट्रला केवळ दोन बळींची आवश्यकता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वांद्रे कुर्ला संकुल येथे सुरू असलेल्या या सामन्यात २८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने सलामीवीर यशस्वी जैस्वालला (९) लवकर गमावले. मात्र, यानंतर पृथ्वी शॉ (९९ चेंडूंत ६८ धावा) आणि सूर्यकुमार यादव (४६ चेंडूंत ३८) यांनी ८३ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. परंतु हे दोघे तीन षटकांच्या अंतराने बाद झाल्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत सापडला. कर्णधार अजिंक्य रहाणे (१६) आणि सर्फराज खान (२०) या प्रमुख फलंदाजांना फारसे योगदान देता आले नाही. हार्दिक तामोरेही (५) झटपट माघारी परतला. त्यामुळे मुंबईची ६ बाद १५६ अशी स्थिती झाली. मग शम्स मुलानी (नाबाद ३०) आणि पदार्पणवीर मुशीर खान (२३) यांनी ४७ धावांची भागीदारी रचत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मुशीर आणि शशांक अत्तरडे (१) सलग दोन षटकांत बाद झाल्याने मुंबईचा संघ पुन्हा अडचणीत सापडला. दिवसअखेर मुलानीसह तुषार देशपांडे (नाबाद ५) खेळपट्टीवर होता.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी ६ बाद १२० धावांवरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रने दुसऱ्या डावात २२० धावांची मजल मारली. आठव्या क्रमांकावरील धमेंद्रसिंह जडेजाने १२५ चेंडूंत ९० धावांची उत्कृष्ट खेळी केली. मुंबईकडून पहिल्या डावात ४ बळी मिळवणाऱ्या मुलानीने दुसऱ्या डावात ६५ धावांत ६ बळी मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy score updates saurashtra vs mumbai mumbai needs 62 to win with two wicket in hand zws