Ratan Tata and Tata Group Connection With Cricket: भारतातील प्रसिद्ध टाटा समुहाचे चेयरमन रतन टाटा यांचे बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वही शोकाकुल झाले आहे. रतन टाटा यांनी केवळ देशाची अर्थव्यवस्थाच पुढे नेली नाही तर देशात क्रिकेट खेळाला पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. रतन टाटा यांनी टाटा समूहाअंतर्गत खेळाडूंना नोकऱ्या, आर्थिक मदत तसेच महत्त्वाच्या संधी दिल्या.

टाटा स्पोर्टस क्लब

टाटा स्पोर्ट्स क्लब (टीएससी)ची स्थापना १९३७ मध्ये झाली. तेव्हापासून हा वारसा पुढे चालवला जात आहे. जेआरडी टाटा ४० वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष असताना या क्लबने सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. टीएससीला समूह कंपन्यांचा नेहमीच पाठिंबा होता आणि सर्व कंपन्यांचे खेळाडू यात प्रतिनिधित्व करत असत. अनेक टाटा क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यांच्यापैकी अनेकांची भारतीय क्रिकेट संघात प्रभावी कारकीर्द राहिली आहे.

हेही वाचा – Ratan Tata Death: “इतरांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी जगलात…”, रोहित शर्माची रतन टाटांसाठी भावुक करणारी पोस्ट; सूर्यकुमार यादवनेही व्यक्त केली कृतज्ञता

१९६० च्या सुरुवातीस नारी कॉन्ट्रॅक्टर, माजी भारतीय क्रिकेटपटू (टाटा मोटर्स) सह, तर ८० आणि ९० च्या दशकात रवी शास्त्री (टाटा स्टील) आणि दिलीप वेंगसरकर (टाटा पॉवर) तर अलीकडे सौरव गांगुली (टाटा स्टील) आणि एमएस धोनी (इंडियन एअरलाइन्स) अशा भारताच्या दिग्गज खेळाडूंनी टाटा समुहातील कंपन्यांचे नेतृत्त्व केले होते.

भारताचे अनेक दिग्गज क्रिकेटपटू टाटा समुहाचा भाग

फारूक इंजिनियर (टाटा मोटर्स), मोहिंदर अमरनाथ (एअर इंडिया), जवागल श्रीनाथ (इंडियन एअरलाइन्स), संजय मांजरेकर (एअर इंडिया), किरण मोरे (टीएससी), रुसी सुरती (आयएचसीएल), संदीप पाटील (टाटा ऑइल मिल्स), व्हीव्हीएस लक्ष्मण (इंडियन एअरलाइन्स), युवराज सिंग (इंडियन एअरलाइन्स), हरभजन सिंग (इंडियन एअरलाइन्स), सुरेश रैना (एअर इंडिया), रॉबिन उथप्पा (एअर इंडिया), मोहम्मद कैफ (इंडियन एअरलाइन्स), निखिल चोप्रा (इंडियन एअरलाइन्स), इरफान पठाण (एअर इंडिया), आरपी सिंग (एअर इंडिया), दिनेश मोंगिया (इंडियन एअरलाइन्स), अजित आगरकर (टाटा स्टील), रोहन गावस्कर, रमेश पोवार आणि अगदी अलीकडे शार्दुल ठाकूर (टाटा पॉवर) जयंत यादव (एअर इंडिया) आणि झुलन गोस्वामी (एअर इंडिया) या खेळाडूंनाही टाटा समुहाने पाठिंबा दिला आहे आणि हे खेळाडू टाटा समुहाकडून खेळले आहेत. टाटा समुहातील कोणत्या कंपनीकडून हे खेळाडू खेळले आहेत, त्या कंपनीचे नाव पुढे कंसात दिले आहे.

हेही वाचा – Ratan Tata Death: रतन टाटा आणि सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ भेटीचा फोटो होतोय व्हायरल, सचिनने निधनानंतर राहत्या घरी जाऊन घेतलं अंत्यदर्शन

वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंपासून ते भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्यापर्यंत

द क्विंटच्या एका स्तंभात क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी लिहिले होते, “१९६० आणि ७० च्या दशकात प्रत्येक नवोदित क्रिकेटपटूला इंग्लंडला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्याचे वेड होते. मीही त्याला काही अपवाद नव्हतो. माझ्या शालेय जीवनापासून, माझ्या पालकांनी मला नेहमी हेच सांगितले की, जर एखाद्याला क्रिकेट खेळायचे असेल तर ते इंग्लंडमध्ये खेळले पाहिजे. क्रिकेटच्या मक्का म्हणजेच लॉर्ड्समध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न होते. १९७९ मध्ये मला एक मोठी संधी दिली, मी काम करत असलेल्या टाटा ऑइल मिल्सने मी तिथे जाऊन क्रिकेट खेळेन या एका अटीवर त्यांनी माझे इंग्लंडला जाण्याचे तिकिट स्पॉन्सर केले होते.”

शास्त्रींनी टू स्ट्राइव्ह अँड टू सोर या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, “टाटा हे काम करण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी उत्तम समुह आणि लोक होते. आम्ही एक मजबूत संघ होतो. आम्ही जवळपास सर्वांबरोबर खेळलो आणि त्यांनाही पराभूतही केलं.”

हेही वाचा – IND W vs SL W: भारताने वर्ल्डकपमध्ये घेतला आशिया कपचा बदला, गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल

टाटा स्पोर्ट्स क्लब संघाने अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकल्या आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले. १९५० पासून टाटा समूहाने अनेक रणजी आणि दुलीप ट्रॉफी खेळाडूंना मदत करण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे. ७० आणि ९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, रणजी ट्रॉफीतील बॉम्बे संघाचे सात कर्णधार हे टाटा समूहाचे होते. मुंबई क्रिकेट संघाला सुरूवातीच्या काळात बॉम्बे संघ म्हणून ओळखळे जात होते. त्या सात कर्णधारांमध्ये मिलिंद रेगे, सुधीर नाईक, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, राजू कुलकर्णी, लालचंद राजपूत आणि शिशिर हट्टंगडी यांचा समावेश होता.

हेही वाचा – VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल

मिलिंद रेगे यांना अवघ्या १८ वर्षांचे असताना TSC मध्ये नोकरी देण्यात आली होती, त्यांना जेआरडी टाटा यांनी भेटण्यासाठी आमंत्रित करणाऱ्या पहिल्या कॉलबद्दल त्यांनी सांगितले होते. सकाळी कॉलेज आणि दुपारी नेट राव अशा त्याच्या दैनंदिन वेळापत्रकावर चर्चा करताना, कॉलेज संपल्यानंतर दुपारी २.३० वाजता ऑफिसला पोहोचून आणि मग ३.३० वाजता रोजच्या नेट सरावासाठी जात असतं, तरी ते टाटा स्टीलमध्ये सामील होऊ शकतात असे जेआरडी टाटा यांनी सुचवले होते. तेव्हा रेगे भारावून गेले होते. तीन वर्षे हे असेच चालू राहिले. “महत्त्वाचं म्हणजे, टाटा खेळांना प्रोत्साहन देत होते आणि त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा खेळाला पहिली पसंती होती,” हे रेगे यांनी टू स्ट्राइव्ह अँड टू सोअरमध्ये सांगितले आहे. रेगे यांनी टीएससी क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले होते.

Mr Ratan N Tata with Sourav Ganguly at the Diamond Jubilee of Tata Sports Club
रतन टाटा आणि सौरव गांगुली (Photos courtesy Tata Central Archives)

क्रिकेटसाठी टाटांची बांधिलकी वर्षानुवर्षे तशीच अविरत सुरू होती. १९७० मध्ये, सीसीआयच्या तरुण क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या एका संघाला वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांसाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले. टीएससीकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय क्लबना भारतात खेळण्यासाठी आमंत्रित केले जात असे. १९८७ मध्ये, स्टार क्रिकेट क्लब, जे तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षिण देत असत, त्यांना टाटा समूहाने वारंवार मदत केली, ज्यामुळे ते त्यांचे काही प्रतिभावान खेळाडू इंग्लंडला पाठवू शकले.

टाटा समूहाचे क्रिकेट स्टेडियम उभारणीत मोलाचे योगदान

सध्याच्या काळातही टाटा ग्रुप क्रिकेटपटूंना पाठिंबा देत आहे. टाटा पॉवरने अष्टपैलू शार्दुल ठाकूरला सपोर्ट करत आहे. तर गोलंदाज जयंत यादव एअर इंडियाचा एक भाग आहे. टाटा समूहाकडे सध्या आयपीएलचे प्रायोजकत्वही आहे. क्रिकेट जगतातील मोठी लीग स्पर्धा असलेल्या आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिपही टाटा समुहाकडेच आहे.

टाटा समुहाने केवळ क्रिकेटपटूंना आर्थिक सहाय्यचं केलं नाही तर क्रिकेट स्टेडियम उभारण्यातही मोठे योगदान दिले आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक असं वानखेडे स्टेडियम या दोन्ही क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीत टाटा समुहाने मोठी मदत केली आहे. वानखेडे स्टेडियमच्या मैदानावरील एका बाजूला टाटा एंड असं नावही देण्यात आले आहे. तर १९३९ साली टाटा समुहाने जमशेदपूरमध्ये स्वतचं क्रिकेट मैदान तयार केलं, ज्याचं नाव कीनन क्रिकेट स्टेडियम आहे. फक्त क्रिकेटच नाही तर इतर अनेक खेळांमध्ये टाटा समुहाने आपली छाप पाडली आहे.