ही नजाकत रोहितमध्ये आहे हे आपल्याला सर्वाना माहितच होते. पण आपल्याला बोचत होता तो सातत्याचा अभाव. काही वेळा बेफिकीरी. पण मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाल्यापासून त्याचा दृष्टिकोन बदलल्यासारखा वाटतोय. ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशाविरुद्ध खेळलेल्या इनिंग नंतर असे वाटू लागले की भारताच्या फलंदाजीचे सुद्धा जबाबदारीने पालकत्व घ्यायला तो आपली मानसिकता बदलतोय. तो वेळ देऊन खेळतोय. त्याची शतके मोठी होत चालली आहेत. नजाकतीला सातत्याची जोड़ नक्की मिळतीये. भारतीय क्रिकेटकरता हां शुभसंकेत आहे.
‘रोहितच्या शतकानंतर देखील मॅच हरलो मग काय उपयोग?’ असं वाटण्यापेक्षा या खेळीचे आपण साक्षीदार होतो यात विलक्षण आनंद आहे. उपयोग, निरूपयोग, नफ़ा, तोटा याच्यापलीकडे जाऊन केवळ आणि केवळ आनंदाच्या निधानाने रोहितजी फलंदाजी पाहिली तर त्याचे मोल शब्दांत करणे अवघड आहे. चला तर मग प्रेक्षक आणि समीक्षकाची झूल उतरवून रसिकाचा भरजरी पेहराव घालूया आणि रोहितचे तोंडभरून कौतुक करूया. सूपर्ब रोहित. तबियत खुश हो गयी.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com