Ravi Shastri’s reply on Ajinkya Rahane’s selection: अजिंक्य रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (डब्ल्यूटीसी) भारतीय संघात निवड झाली आहे. आयपीएल २०२३ मध्ये रहाणेची कामगिरी जबरदस्त राहिली असून त्यामुळेच त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली आहे, असे अनेकांचे मत आहे. मात्र, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या मताशी सहमत नाहीत. ते म्हणाला की रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे आणि त्याचे फळ त्याला मिळाले आहे.
अजिंक्य रहाणेबद्दल बोलायचे, तर त्याची आयपीएल २०२३ मधील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आतापर्यंत त्याने सहा डावांत ४४.८० च्या प्रभावी सरासरीने २२४ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, रहाणेची भारतीय कसोटी संघात निवड झाली, तेव्हा आयपीएलच्या कामगिरीच्या आधारावर त्याची डब्ल्यूटीसी फायनलसाठी निवड झाल्याची चर्चा होती. यावर रवी शास्त्री मानतात की रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
अय्यर जखमी होताच रहाणेकडे जायला हवे होते –
ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला खूप आनंद आहे की रहाणेने संघात स्थान मिळवले आहे. त्याने आयपीएलमध्ये खूप चांगली फलंदाजी केली असून तो चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. तसेच, आपण हे विसरू नये की त्याच्याकडे खूप अनुभव आहे. अय्यर जखमी होताच तुम्ही रहाणेकडे जायला हवे होते.”
हेही वाचा – फोटोच्या नादात धवल कुलकर्णी विसरला माणुसकी; रस्त्यावर पडलेल्या मुलीला केली नाही मदत, VIDEO व्हायरल
अजिंक्य रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या – रवी शास्त्री
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “लोकांना वाटते की रहाणेची भारतीय संघात त्याच्या तीन आयपीएल सामन्यांतील कामगिरीच्या आधारे निवड करण्यात आली आहे. रहाणे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत असताना असे लोक सुट्टीवर गेले असावेत. हे लोक तेव्हा कुठल्यातरी जंगलात राहत असावेत आणि त्यांचा जगाशी संपर्क आला नसावा. जेव्हा तुम्ही सहा महिन्यांच्या सुट्टीवर जाता, तेव्हा तुम्हाला या ६०० धावांबद्दल कशी माहिती मिळेल.”
अजिंक्य रहाणेने रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने सात सामन्यांत ५७.६३ च्या सरासरीने ६३४ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि एक अर्धशतक झळकले. त्याचबरोबर त्याची सर्वोच्च धावसंख्या २०४ होती.