Ravichandran Ashwin Completes 350 Test Wickets In India : टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विन हा भारतातील सर्वात घातक गोलंदाज मानला जातो. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत. या यादीत त्याने आणखी एका विक्रमाची भर घातली आहे. यावेळी त्याने भारतात अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कोणताही गोलंदाज करू शकला नव्हता. त्याने अनिल कुंबळेला एका मोठ्या विक्रमात मागे टाकले आहे. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडच्या बेन डकेटला बाद करुन ऐतिहासिक पराक्रम केला.

आर अश्विनचा ऐतिहासिक पराक्रम –

आर अश्विनने रांची कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात २ बळी घेत भारतात ३५१ कसोटी बळी पूर्ण केले आहेत. यासह तो भारतातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. या खास यादीत त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने भारतात ३५० कसोटी विकेट्स घेतल्या होत्या. यासह तो ३५० हून अधिक भारतात कसोटी बळी घेणारा टीम इंडियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने बेन डकेट आणि ऑली पोप यांची विकेट घेत भारतीय भूमीवर ३५० कसोटी बळी पूर्ण केले. बेन डकेट त्याचा ३५० वा बळी ठरला आणि ऑली पोप त्याचा ३५१ वा बळी ठरला. या दोन विकेट्ससह, अश्विनने अनिल कुंबळेला मागे सोडले, ज्याने ६३ कसोटी सामन्यांमध्ये २४.८८ च्या सरासरीने ३५० बळी घेतले होते.

भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

आर अश्विन – ३५१ विकेट्स (वृत्त लिहिपर्यंत)
अनिल कुंबळे – ३५० विकेट्स
हरभजन सिंग – २६५ विकेट्स
कपिल देव – २१९ विकेट्स
रवींद्र जडेजा – २१० विकेट्स

हेही वाचा – SL vs AFG 3rd T20 : पंचांशी वाद घालणं पडलं महागात; श्रीलंकेच्या कर्णधारावर आयसीसीची मोठी कारवाई

रांची कसोटी सामन्यात आतापर्यंतची परिस्थिती –

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३५३ धावा केल्या होत्या. जो रुट १२२ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरात टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ ३०७ धावा करता आल्या. भारताकडून ध्रुव जुरेलने सर्वाधिक ९० धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून शोएब बशीरने ५ बळी घेतले. अशा स्थितीत इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी, दुसऱ्या डावात वृत्त लिहिपर्यंत ५० धावांत २ गडी गमावले आहेत. या दोन्ही विकेट आर अश्विनच्या नावावर होत्या.

Story img Loader