R Ashwin World Record: भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्यात त्याने ११ विकेट घेतले. तर एका शतकासह त्याने फलंदाजीत एकूण ११४ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीसाठी अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा मालिकावीराचा पुरस्कार पटकावताच रविचंद्रन अश्विनने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पण अश्विनचा हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्यापासून एक पाऊल मागे राहिला आहे,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत वि बांगलादेश मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावताच रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा मुथैय्या मुरलीधरन यांच्या विक्रमाची बरोबरी केली. पण आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात अश्विनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले होते, पण आता तो पुरस्कार त्याला देण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तो १२ वेळा हा पुरस्कार पटकावण्याच्या विश्वविक्रमापासून फक्त एक पाऊल मागे आहे.

हेही वाचा – Ramiz Raja on Team India: “…म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा धाक निर्माण झाला आहे”, रमीझ राजा यांनी टीम इंडियाचं केलं कौतुक

वेस्ट इंडिजमध्ये अश्विनने घेतल्या होत्या १५ विकेट्स

वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. अश्विनने या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ७१ धावांत ७ विकेट देऊन वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. दोन सामन्यांत एकूण १५ विकेट घेत त्याने फलंदाजीतही जबरदस्त कामगिरी केली. असे असूनही, मालिका संपल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड सादरीकरणादरम्यान अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यास विसरले. त्यामुळे अश्विनच्या खात्यात हा पुरस्कार जमा होऊ शकले नाही.

हेही वाता – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, क्रिकेट वेस्ट इंडिजशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी प्रायोजकत्वाचे काम हाताळणाऱ्या भारतीय एजन्सीबद्दल सांगितले. पण त्यांच्याशी संपर्क साधला असता, भारतीय एजन्सीने सांगितले की ते फक्त व्यावसायिक बाबी हाताळतात. मालिकावीराचा पुरस्कारा देण्याची जबाबदारी क्रिकेट वेस्ट इंडिजची आहे.

वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर

दोन किंवा अधिक सामन्यांच्या प्रत्येक मालिकेच्या शेवटी मलिकावीराचा पुरस्कार दिला जातो. जर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान हा पुरस्कार देण्यास विसरले असेल, तर ते नंतर टीम इंडियाकडेही सोपवू शकले असते. मात्र आजतागायत या प्रकरणात काहीही घडले नाही.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

अश्विनला हा पुरस्कार मिळाला असता तर त्याने कानपूर कसोटी सामन्यादरम्यान मिळालेला मालिकावीराचा किताब जिंकून विश्वविक्रम केला असता. मात्र, अश्विन या यादीत अव्वल स्थानावर आहे कारण त्याने केवळ ३९ कसोटी मालिकेत ११ वेळा मालिकावीराचा पुरस्कार पटकावला आहे. तर मुरलीधरनने ६१ कसोटी मालिकेत ११ वेळा हा पुरस्कार पटकावला होता. आता अश्विनला न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवून विश्वविक्रम करायचा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin did not get player of the series award from west indies cricket board on india tour denied ashwin a world record bdg