Ravichandran Ashwin on Rohit Sharma captaincy : महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार मानला जातो. त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला शिखरावर नेले. आता रोहित शर्माने टी-२० विश्वचषक जिंकून स्वतःला त्याच श्रेणीत आणले आहे. धोनी आणि रोहितशिवाय विराट कोहलीच्या कर्णधारपदाचेही खूप कौतुक झाले आहे. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या आक्रमक वृत्तीने चाहत्यांची मने जिंकली. अशा स्थितीत अश्विनने सांगितले की धोनी-विराटच्या तुलनेत रोहितच्या नेतृत्त्वशैलीत कोणता मोठा फरक आहे.

भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने धोनी, रोहित आणि कोहली यांच्या कर्णधारपदाच्या शैलीतील मुख्य फरकांबद्दल सांगितले आहे. अश्विन या तिघांच्याही कर्णधारपदाखाली खेळला आहे आणि गेल्या दशकात संघाच्या महत्त्वाच्या कामगिरीचा तो एक भाग आहे. अलिकडच्या काळात तिन्ही भारतीय कर्णधारांची तुलना केली जात आहे, परंतु अश्विनने एका प्रमुख क्षेत्राकडे लक्ष वेधले जेथे रोहित कर्णधारपदात विराट आणि धोनीपेक्षा खूपच वेगळा आहे. तो म्हणाला की रोहित इतर दोघांपेक्षा जास्त योजना आखतो.

अश्विन रोहितबद्दल काय म्हणाला?

अश्विनने विमल कुमारला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “धोनी-विराटच्या तुलनेत रोहितच्या नेतृत्त्वशैलीच्या २-३ गोष्टी अधिक चांगल्या आहेत. तो संघातील वातावरण नेहमी हलके ठेवण्याचा प्रयत्न करतो. रोहित अतिशय संतुलित आणि रणनीतिकदृष्ट्या मजबूत आहे. धोनी आणि विराट स्ट्रॅटेजिकली देखील मजबूत होते. पण रोहितने रणनीतीवर अधिक काम केले.” अश्विनने हे देखील उघड केले की कोणत्याही मोठ्या सामन्या किंवा मालिकेपूर्वी रोहित भारतीय क्रिकेट संघाच्या विश्लेषक संघासोबत बसतो आणि काही खेळाडूंसाठी योग्य रणनीती तयार करतो.

हेही वाचा – जय शाहांनी ICC च्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारताच पाकिस्तानला होणार फायदा, PCB प्रमुखांना मिळणार मोठी जबाबदारी

रोहित शर्मा करतो विशेष तयारी –

अश्विन पुढे म्हणाला, “कोणताही मोठा सामना किंवा मालिका येत असेल तर रोहित विश्लेषक संघ आणि प्रशिक्षकांसोबत बसतो आणि त्याची तयारी करतो. जसे की एखाद्या विशिष्ट फलंदाजाची कमजोरी काय असते, गोलंदाजाची योजना काय असते. ही रोहितची ताकद आहे. तो संघातील वातावरण नेहमी हलके ठेवतो आणि खेळाडूंना साथ देतो. जर त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये एखादा खेळाडू निवडला, तर तो त्याला १००% सपोर्ट करतो. हे मी स्पष्टपणे सांगू शकतो, कारण या तीन कर्णधारांसोबत मी माझ्या कारकिर्दीतील बहुतांश वेळ घालवला आहे.”