वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेमध्ये यजमान संघाविरुद्ध खेळताना गेल्या शुक्रवारी रविंद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर या दोघांनी संघाचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांच्याकडे घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. त्या दिवशी मैदानावर केलेल्या वर्तणुकीबद्दल दोघांनी श्रीधर यांच्याकडे खेद व्यक्त केला. या पद्धतीची वर्तणूक पुन्हा होणार नाही, असे आश्वासनही दोघांनी दिले असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
जडेजा आणि रैना यांच्यातील भांडणाची चौकशी करण्याचे आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाचे व्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांना दिले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध सामना सुरू असतानाच मैदानावर जडेजा आणि रैना यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.
ही घटना घडल्यानंतर लगेचच बीसीसीआयने श्रीधर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीचा अहवालही लवकरात लवकर देण्यासही सांगण्यात आले होता. शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा सुनील नरिन बाद झाल्यानंतर जडेजा आणि रैना यांच्यामध्ये वादविवाद झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja and suresh raina spat to be probed by team manager mv sridhar