Rinku Singh Avesh Khan Khaleel Ahmed Reaction on India Win Vs Pakistan : भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानवर सहा धावांनी रोमांचक विजय मिळवून, टी-२० विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या विजयाचा आनंद साजरा केला. या विजयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्येही मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक चाहते भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे फलंदाज रिंकू सिंगदेखील पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या विजयाने भलताच खूश झाला. स्टेडियममध्ये बसून तो भारत-पाकिस्तानचा लाईव्ह सामना पाहत होता. यावेळी भारतीय संघ जिंकताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. रिंकूसह खलील अहमद अन् आवेश खानदेखील स्टेडियममध्ये उपस्थित होते. या तिघांच्या जंगी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताच्या जबरदस्त विजयाने रिंकू, खलील, आवेश झाले भलतेच खूश

रिंकू सिंग व्यतिरिक्त आवेश खान आणि खलील अहमद भारतीय राखीव संघाचा भाग आहेत. यामुळे तिघेही भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कच्या स्टेडियममध्ये उपस्थित होतो. यावेळी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ जिंकताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही, तिघेही भरस्टेडियममध्ये उभे राहून आनंदाने जोरजोरात ओरडत, हसत, नाचत सेलिब्रेशन करताना दिसले. कॅमेऱ्याकडे ‘ऐ जीत गये’ म्हणत आनंदाने हसताना दिसतायत. तर त्याचवेळी रिंकू सिंग मैदानावरील दृश्य आपल्या मोबाइलवर रेकॉर्डिंग करत होता. या तिघांच्याही चेहऱ्यावरील आनंद पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आपसूकच हसू उमटेल. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड झाली, त्यात १५ सदस्यीय संघात रिंकू सिंगचा समावेश नव्हता. त्याला ट्रॅव्हलिंग रिझर्व्हमध्ये ठेवण्यात आले होते. आयपीएलदरम्यान रिंकू सिंगला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून त्याने चांगली कामगिरी केली होती, मात्र रिंकू ऐवजी शिवम दुबेला संधी देण्यात आली, जो आत्तापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

रिंकू सिंगने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १५ सामने खेळले असून यादरम्यान त्याने ११ डावात ३५६ धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १७६ राहिला. मात्र, असे असतानाही त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. शिवम दुबेच्या फ्लॉपनंतरही निवडकर्त्यांनी रिंकू सिंगला संघात स्थान न देऊन मोठी चूक केली का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या लो-स्कोअरिंग सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. भारतीय संघ ११९ धावांवर ऑलआऊट झाला, तेव्हा येथून जिंकू असे कोणालाही वाटले नाही. मात्र, प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला केवळ ११३ धावाच करता आल्या. मोहम्मह रिझवानशिवाय अन्य कोणताही फलंदाज जास्त वेळ टिकू शकला नाही, त्यामुळे पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभावाचा सामना करावा लागला.