Rishabh Pant Statement on Why He Set Bangladesh Field: ऋषभ पंतने ६३३ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. ऋषभ पंतने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १२८ चेंडूत ४ षटकार आणि १३ चौकारांसह १०९ धावा केल्या. रोहित शर्मानेही ऋषभ पंतने पुनरागमनानंतर केलेल्या शतकाचे कौतुक केले. पण या शतकी खेळीदरम्यानचा ऋषभ पंतचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो बांगलादेश संघाला फिल्ड सेट करायला मदत करत होता. यावर आता ऋषभ पंतने उत्तर दिलं आहे.

चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिले सत्र सुरू होते, ज्यात ऋषभ पंत शुबमन गिलबरोबर फलंदाजी करत होता. पंत क्रिझवर होता त्यादरम्यान बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो फिल्ड सेट करत होता आणि हे पाहून पंत आधी म्हणाला, “अरे इथे एक फिल्डर पाहिजे, एक फिल्डर इथे मिडविकेटवर…”

हेही वाचा – IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

IND vs BAN: ऋषभ पंतने फलंदाजी करताना बांगलादेशची फिल्डिंग का सेट केली?

काही वेळातच पंतचा हा व्हिडिओचांगलाच व्हायरल झाला आणि मग कॉमेंटेटर्सने यावर चर्चा केली. ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग असलेल्या माजी यष्टिरक्षक सबा करीम यांनी भारताच्या विजयानंतर पंतला विचारले की, ‘हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या डावात तस्किन अहमद गोलंदाजी करायला येत होता. तुम्ही त्याच्यासाठी मैदान सेट करायला का सुरुवात केली? अतिशय प्रामाणिक प्रश्न. आता तूच सांग बांगलादेशचा कर्णधार कोण शांतो की ऋषभ पंत? शांतोनेही तू सांगितलं तसं ऐकलं, असं का?’

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा

सबा करीम यांच्या प्रश्नांच्या उत्तरात ऋषभ पंत म्हणाला, “कधीकधी अजय जडेजा यांच्याशी मैदानाबाहेर चर्चा होते. त्यांचं म्हणण आहे की, कुठेही खेळा. इतर संघ खेळत असो किंवा स्वतः खेळत असाल. क्रिकेट हे चांगलंच खेळलं गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे मिडविकेटवर एकही क्षेत्ररक्षक नव्हता आणि एका ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक उभे होते, म्हणून मी म्हणालो, इथे एक क्षेत्ररक्षक ठेवा.”

ऋषभ पंतबरोबर शुबमन गिलनेही या डावात शतक झळकावले. त्याने ११९ धावांची नाबाद खेळी खेळली. तर भारताच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने ११३ धावा आणि रवींद्र जडेजाने ८६ धावा केल्या. भारताने हा सामना २८० धावांनी जिंकला. या मालिकेचा पुढील कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे.