एकदिवसीय मालिकेत धावांसाठी झगडणाऱ्या भारतीय फलंदाजांनी सराव सामन्यात खेळपट्टी आणि वातावरणाशी जुळवून घेत अपेक्षित अभ्यास केला. सराव सामन्याचा निर्णय अनिर्णीत राहिला असला तरी भारतीय खेळाडूंनी आपल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देत परिपक्व होण्यासाठी प्रयत्न केले.
न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध बिनबाद ४१ वरून दुसऱ्या दिवशी पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने ३१३ धावांची मजल मारत कसोटी मालिकेसाठी आपली तयारी केली. कालच्या धावसंख्येत भर न घालता मुरली विजय तंबूत परतला. त्याने १९ धावा केल्या. शिखर धवनची २६ धावांची खेळी अचूक धावफेकीमुळे संपुष्टात आली. भारताचा रनमशीन ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने ३३ धावा करत डाव सावरला. कसोटी संघात स्थान पक्के करण्याची संधी असलेल्या मुंबईकर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी खेळी करत कसोटी मालिकेकरिता सज्ज असल्याचे दाखवून दिले. रोहितने ७ चौकारांसह ५९ धावांची खेळी केली, तर अजिंक्यने ५ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा फटकावल्या. राखीव फलंदाज अंबाती रायुडूने ४९ धावा करत धावसंख्या वाढवली. गोलंदाज म्हणून संघात असलेल्या रविचंद्रन अश्विनने सराव सामन्यातही फलंदाजाची चुणूक दाखवत ६ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावांची आक्रमक खेळी साकारली.
धोनीच्या ऐवजी संधी मिळालेल्या वृद्धिमान साहाला केवळ ४ धावाच करता आल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ७ बाद ३१३ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी ६ फेब्रुवारीपासून ऑकलंड येथे सुरू होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा