Rohit Sharma Argue With Umpire in IND vs NZ Bengaluru Test Video: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने वेळोवेळी व्यत्यय आणला आहे. सततच्या पावसाने सामन्याची दिशा बदलण्यातही भूमिका बजावली आहे. बंगळुरूमधील पावसामुळेच पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, इतकंच काय तर नाणेफेकही झाली नव्हती. आता सामन्याच्या चौथ्या दिवशीही पावसाने टीम इंडियाची परीक्षा घेतली . खेळाच्या चौथ्या दिवशी दोन वेळा पावसामुळे सामना थांबवला गेला. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या शेवटी असं काही घडलं की ज्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय खेळाडू नाराज झाले. इतकंच नव्हे तर रोहित आणि विराट पंचांशी वाद घालतानाही दिसला.

भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी ४६२ धावा केल्या. यासह भारताने न्यूझीलंड संघाला विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडच्या डावालाही लगेच सुरूवात झाली. भारतीय संघ गोलंदाजीसाठी आला आणि रोहित शर्माने पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी टीम इंडियाला ब्रेकथ्रू मिळेल, अशी रोहित शर्मासह सर्वांचीच इच्छा होती. बुमराहही भेदक गोलंदाजी करत होता. पण विकेट पडण्याआधीच पंचांच्या इशाऱ्यामुळे किवी फलंदाज अचानक पॅव्हेलियनच्या दिशेने निघाले.

हेही वाचा – IND vs NZ: भारतीय संघाने घडवला इतिहास, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

रोहित शर्मा आणि पंचांमध्ये वाद

IND vs NZ: रोहित शर्मा पंचांवर का भडकला?

सामन्याच्या चौथ्या डावातील पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहने फक्त चार चेंडू टाकले होते. तितक्यात पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला. लाईट मीटरने प्रकाश तपासल्यानंतर पंचांनी सामना थांबवण्याचे जाहीर केले. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता. रोहित शर्माशिवाय टीम इंडियाचे इतर खेळाडूही नाराज दिसले. अजून प्रकाश आहे आणि सामना खेळवता येईल किंवा एक षटक तरी पूर्ण करावे, असं रोहित पंचांना सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवत होते.

हेह वाचा – IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी गमावली तर काय होणार? कसं असणार WTC फायनलचं समीकरण?

रोहित शर्मा पंचांना समजावत होता पण तोपर्यंत किवी फलंदाज कॉन्वे आणि लॅथम मैदानाबाहेर गेले होते. शेवटी भारतीय संघालाही माघारी जावे लागले आणि सामना थांबवण्यात आला. यामुळे टीम इंडिया खूपच संतप्त दिसत होती. रोहित शर्माच्या चेहऱ्यावर तर राग स्पष्ट दिसत होता आणि त्यानंतर रोहितबरोबर विराट कोहलीही पंचांशी बोलताना दिसला. पण याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर काही वेळाने पावसानेही हजेरी लावली आणि मग चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.