IND vs BAN 2nd Test Scorecard Rohit Sharma Record: भारत बांगलादेश कानपूर कसोटीत भारताने बांगलादेशला २३३ धावांवर ऑल आऊट केले. यानंतर भारताकडून फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने टी-२० स्टाईल फटकेबाजी करत भारताच्या नावे सर्वात जलद ५० आणि सर्वात जलद १०० धावा करण्याचा विक्रम केला आहे. यशस्वी जैस्वाल येताच त्याने पहिल्याच षटकात तीन चौकार मारले पण रोहित शर्माने तर षटकार, चौकारांचा पाऊस पाडला. रोहितने पहिल्याच दोन चेंडूवर गगनचुंबी षटकार लगावले यासह रोहितने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.

रोहित शर्माने खालिद अहमदच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले आणि कसोटीत पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारणारा तो पहिला सलामीवीर ठरला आहे. तर याशिवाय खेळाडू म्हणून ही कामगिरी करणारा रोहित शर्मा चौथा खेळाडू आहे. हा पराक्रम सर्वप्रथम फोफी विल्यम्सने १९४८ मध्ये केला होता. यानंतर २०१३ मध्ये सचिनने पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. उमेश यादवही या यादीत आहे, ज्याने २०१९ मध्ये पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. पण कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सलामीवीराने ही कामगिरी केली आहे.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO

सर्वात वेगवान अर्धशतक आणि शतक

रोहित शर्माने पहिल्या डावात केवळ २३ धावा केल्या, पण बाद होण्यापूर्वी या खेळाडूने यशस्वी जैस्वालसह आणखी एक मोठा विक्रम केला. रोहित आणि यशस्वीने टीम इंडियाची धावसंख्या अवघ्या ३ षटकांत ५० धावांच्या पुढे नेली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या संघाला अवघ्या ३ षटकांत पन्नास धावांचा टप्पा गाठता आला आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता, ज्याने यावर्षी नॉटिंगहॅममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४.२ षटकात पन्नास धावा पूर्ण केल्या होत्या. भारताने १०.१ षटकांत १०० धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने कसोटीत इतक्या जलद १०० धावांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा – IND vs BAN: ३०० पार… रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये घडवला इतिहास, ही कामगिरी करणारा भारताचा पहिलाच फिरकी गोलंदाज

भारतीय संघाने ३० षटकांत २४९ धावा केल्या आहेत. यासह भारताने १६ धावांची आघाडी मिळवली आहे. यामध्ये यशस्वी जैस्वालने ७२ धावा केल्या तर गिल, रोहित आणि ऋषभ पंत अनुक्रमे २३,३९ आणि ९ धावा करत बाद झाले. तर विराट कोहलीला ४७ धावांवर शकिब अल हसनने क्लीन बोल्ड केले. केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे.