Recods Of Rohit Sharma: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चार विकेट्सने विजय मिळवला.
या विजयानंतर, रोहित शर्मा भारताकडून दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. रोहितच्या आधी, एमएस धोनीने तीन आणि सौरव गांगुली व कपिल देव यांनीही भारताला प्रत्येकी एक आयसीसी स्पर्धेते विजेतेपद मिळवून दिले होते.
रोहितने या सामन्यात ८३ चेंडूत ७६ धावांची शानदार खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. रोहितच्या या खेळीत सात चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्याने दुसऱ्याच चेंडूवर काइल जेमिसनला त्याच्या ट्रेडमार्क पुल शॉटद्वारे षटकार मारत खाते उघडले होते. यादरम्यान त्याने ४१ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर रोहितची ७६ धावांची खेळी, त्याची आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिलेच अर्धशतक ठरले.
२७ व्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर, २६.१ षटकात भारताची स्थिती ३ बाद १२२ अशी होती. पण, श्रेयस अय्यर (६२ चेंडूत ४८) आणि अक्षर पटेल (४० चेंडूत २९) यांनी चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. राहुल आणि अक्षर बाद झाल्यानंतर, केएल राहुल (३३ चेंडूत ३४*), हार्दिक पंड्या (१८ चेंडूत १८) आणि रवींद्र जडेजा (६ चेंडूत ९) यांनी ४९ षटकांत भारताला विजय मिळवून दिला.
रोहित जगातील पहिला कर्णधार आहे, ज्याने आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३, एकदिवसीय विश्वचषक २०२३, टी२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या चारही प्रमुख आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत नेले आहे. यामध्ये भारताला भारताला टी२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद मिळवण्यात यश आले.