बंगळूरु : भारतीय संघात फलंदाजांची मजबूत फळी सज्ज आहे. अशा वेळी वेगवान गोलंदाजांची देखिल दुसरी फळी सज्ज असणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीवर अवलंबून राहण्याची वेळ येता कामा नये. संघात समतोल राखणे ही काळाची गरज असल्याचे मत भारताचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले.

सोमवारीच प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गोलंदाजांचे महत्त्व विशद केले होते. त्याची दुसरी बाजू रोहितने समोर आणली. ‘‘अलीकडच्या काळात क्रिकेट वाढले आहे. सातत्याच्या मालिकांमुळे खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न संघांना भेडसावत आहे. अशा वेळी एखादा प्रमुख गोलंदाज जायबंदी झाला, तर संघाचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळेच गोलंदाजांची दुसरी फळीदेखील सज्ज असायला हवी,’’ असे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने सांगितले.

हेही वाचा >>>IND vs NZ India Playing 11: टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू होणार न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, कशी असणार भारताची प्लेईंग इलेव्हन?

आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना रोहित म्हणाला, ‘‘फलंदाजीसाठी जसे आता आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच गोलंदाजांच्या बाबतीत घडायला हवे. एक गोलंदाज खेळू शकला नाही, तर त्याच्या ताकदीचा दुसरा गोलंदाज असल्याची खात्री बाळगता यायला हवी.’’

रोहितची पत्रकार परिषद ही प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या वक्तव्याची दुसरी बाजू असल्याचे सातत्याने जाणवले. संघासाठी जो शंभर टक्के योगदान देऊ शकतो अशा अकरा खेळाडूंची निवड आम्ही करणार असे गंभीर यांनी सांगितले होते. रोहितने त्यांचाच मुद्दा जणू विस्ताराने मांडला. ‘‘आम्ही काही व्यक्तींवर अवलंबून राहू शकत नाही. हे योग्यही नाही. आम्हाला भविष्याचा विचार करायचा आहे. भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हाती असेल, असे योग्य खेळाडू आम्हाला निवडायचे आहेत,’’ असे रोहित म्हणाला.