वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गेल्या नऊ महिन्यांत भारतीय संघाला अनेक चढ-उतरांचा सामना करावा लागला. मात्र, खेळाडूंतील एकी आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्ही ‘आयसीसी’च्या सलग तीन स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आदरास पात्र आहे, असे मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. ‘आयपीएल’ संघ मुंबई इंडियन्सच्या विशेष मुलाखतीत त्याने विविध विषयांवर चर्चा केली.
‘आयसीसी’च्या गेल्या तीन स्पर्धांत भारताने २४ पैकी केवळ एक सामना गमावला. हा पराभव त्यांना २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पत्करावा लागला होता. मात्र, या निराशेतून पुन्हा भरारी घेत रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि यंदा चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. या दरम्यान, भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका गमावली. परंतु एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताने प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले.
‘‘गेल्या तीन मोठ्या स्पर्धांत आमच्या संघाने केलेली कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे. आम्ही या स्पर्धांत मिळून केवळ एकदा पराभूत झालो आणि हा पराभवही आम्हाला अंतिम लढतीत पत्करावा लागला होता. आम्ही हा सामना गमावला नसता आणि सलग तीन स्पर्धांत अपराजित राहून जेतेपदावर मोहोर उमटवली असती, तर ते किती मोठे यश ठरले असते याचा तुम्ही विचार करा. ‘आयसीसी’च्या स्पर्धांत एखाद्या संघाने यापूर्वी २४ पैकी २३ सामने जिंकल्याचे मी ऐकलेले नाही. बाहेरून पाहताना आमच्यासाठी सर्व सकारात्मक गोष्टीच घडल्या असे वाटू शकते, पण आम्ही किती चढ-उतार पाहिले हे आम्हालाच ठाऊक आहे,’’ असे रोहित म्हणाला.
‘‘आम्हाला अनेक कठीण क्षण अनुभवायला मिळाले. मात्र, आम्ही खचलो नाही. त्यामुळेच ‘आयसीसी’च्या सलग तीन स्पर्धांत यश मिळविणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आदरास पात्र आहे. तुम्ही जेव्हा जिंकता, तेव्हा त्याचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे,’’ असे रोहितने नमूद केले.
खेळाडूसाठी जिद्द, चिकाटी सर्वांत महत्त्वाची
मुंबई इंडियन्स संघासाठी ‘आयपीएल’चा गेला हंगाम विसरण्याजोगा ठरला. रोहितच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविल्याने मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने आपल्याच चाहत्यांचा रोष ओढवून घेतला. या परिस्थितीत मुंबईच्या खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र, त्यानंतर रोहित कर्णधार असलेल्या आणि हार्दिक महत्त्वाचा सदस्य असलेल्या भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. ‘‘प्रत्येकच खेळाडूत जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे. याच गोष्टी तुम्हाला यशस्वी बनवतात. ‘आयपीएल’चा गेला हंगाम आमच्यासाठी निराशाजनक ठरला. मात्र, त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक होता. त्यामुळे ‘आयपीएल’नंतर मी लगेचच या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले. माझी ही अखेरची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा असणार हे मला ठाऊक होते. त्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याचे माझे ध्येय होते. इतर खेळाडूंच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते. प्रत्येकच खेळाडूने वेळोवेळी योगदान दिले आणि आम्ही विश्वचषक उंचावला,’’ असे रोहितने सांगितले.