Rohit Sharma on Why He Choose Batting After Winning Toss: भारत वि न्यूझीलंड बंगळुरू कसोटीत भारतीय संघाने घरच्या मैदानावर कसोटीत सर्वात कमी धावसंख्या नोंदवली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या कामगिरीला कारणीभूत ठरणारा एक निर्णय म्हणजे नाणेफेक. भारतीय संघाने या कसोटीची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी पावसामुळे मैदान आणि पिच कव्हर केले होते. त्यामुळे मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल असे चित्र होते, तरीही रोहितने नाणेफेकीनंतर फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने लाजिरवाणा रेकॉर्ड आपल्या नावे केला. यावर रोहित शर्माने सामन्यानंतर वक्तव्य केले आहे.

बंगळुरू कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, “खेळपट्टीवर फार गवत नव्हते, अशा सपाट खेळपट्टीवर कुलदीप विकेट घेतो आणि त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये कुलदीपला संधी देण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी थोडी सपाट असेल असे आम्हाला सुरूवातीला वाटले होते. सोप्या भाषेत सांगू तर खेळपट्टीबाबत माझा अंदाज चुकला. मी खेळपट्टी नीट समजून घेऊ शकलो नाही आणि त्यामुळेच संघाची आता ही स्थिती आहे.”

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला, असे त्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर रोहितने स्पष्ट शब्दात सांगितले की, “एक कर्णधार म्हणून संपूर्ण संघ ४६ धावांवर बाद होताना पाहणे वेदनादायक आहे. वर्षभरात एक-दोन चुकीचे निर्णय घेतले जातात, ठीक आहे.”

भारतीय संघ ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर रोहित शर्मा स्वत: पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, यात त्याने स्वत:ची चूक मान्य करत बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित शर्मा स्वत: पत्रकार परिषदेला येऊन त्याने अनेक प्रश्नांची धाडसाने उत्तर दिलं. यामुळे चाहते त्याचं कौतुकही करत आहेत.

हेही वाचा – IND VS NZ: ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर, अपघातात दुखापत झालेल्या गुडघ्याला लागला चेंडू, टीम इंडिया टेन्शनमध्ये

भारतीय संघ ४६ वर सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडने प्रत्युत्तरात चांगली फलंदाजी केली. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३ बाद १८० धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंडने १३४ धावांची आघाडी मिळवली आहे. भारताकडून कुलदीप यादवने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर घातक ठरत असलेल्या डेव्हॉन कॉन्वेला अश्विनने क्लीन बोल्ड केले. तर जडेजाने विल यंगला बाद करत अजून एक विकेट मिळवून दिली.