Rohit Sharma Statement on India Win and His wicket: भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड संघावर १४२ धावांनी मोठा विजय नोंदवला. यासह टीम इंडियाने इंग्लंडवर वनडे मालिकेत ३-० ने निर्भेळ मालिका विजय मिळवला. भारताचा उपकर्णधार शुबमन गिलने या मालिकेतील तिन्ही डावांमध्ये पन्नास अधिक धावा करत मोठा विक्रम केला. तर अखेरच्या सामन्यात त्याने शतक झळकावत अनेक विक्रम मोडत नव्या विक्रमांची आपल्या नावे नोंद केली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकवत आपला फॉर्म परत मिळवला. पण तिसऱ्या वनडे सामन्यात तो एक धाव करत बाद झाला. मार्क वुडने उत्कृष्ट चेंडू टाकत त्याला फिल सॉल्टकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माने मालिका विजयानंतर त्याच्या विकेटबाबत वक्तव्य केलं आहे.
वुडच्या दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू ताशी १४०.४ किमी वेगाने टाकला पण त्याचा हा चेंडू नेमका कुठे पडेल याचा अंदाजच लागला नाही. यामुळे रोहितला खोटा शॉट खेळावा लागला कारण त्याच्याकडे चेंडू रोखण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. यादरम्यान खोटा शॉट खेळण्यासाठी रोहितने थोडी बॅट पुढे केली आणि चेंडू बॅटची कड घेत विकेटकिपरच्या हातात गेला.
रोहित शर्मा त्याच्या विकेटवर म्हणाला, “म्हणजे मी त्या चेंडूवर काहीच करू शकलो नसतो. गोलंदाजाला याचं सर्व श्रेय जातं आणि गोलंदाज हा तुम्हाला बाद करण्यासाठीच तिथे असतो आणि फलंदाज म्हणून ते आव्हान स्वीकारण्यासाठी तुम्ही तिथे असता. मी फक्त चेंडू खेळण्यासाठी गेलो होतो, मी फक्त सामन्यातील माझा दुसरा चेंडू खेळत होतो आणि त्यामुळे त्या चेंडूवर मी काहीच करू शकलो नाही.”
भारताच्या मालिका विजयाबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
भारताच्या मालिका विजयाबाबत रोहित म्हणाला, “ज्याप्रकारे मालिकेत कामगिरी केली आणि निकाल मिळाला हे खूप आनंददायी आहे. आम्हाला माहित होते की आमच्यासमोर आव्हाने असतील. साहजिकच काही गोष्टी आहेत ज्या सुधारणा करण्यासारख्या आहेत आणि मी येथे उभे राहून त्या स्पष्ट करणार नाही. संघात सातत्य राखणं आणि प्रत्येकाची जबाबदारी काय आहे समजून कामगिरी करणं हे आमचं काम आहे.”
पुढे रोहित म्हणाला, “साहजिकच कोणत्याही चॅम्पियन संघाला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करून पुढे जात राहायचं असत. आम्ही जी धावसंख्या उभारली होती ती समाधानी होती. मैदानावर जाऊन हवं तसं खेळण्याचं थोडं स्वातंत्र्य संघात आहे. विश्वचषक हे त्याचे उत्तम उदाहरण होते आणि हे पुढेही करू इच्छितो.”
Captain @ImRo45 is presented the winners trophy by ICC Chairman, Mr @JayShah as #TeamIndia clean sweep the ODI series 3-0 ??
— BCCI (@BCCI) February 12, 2025
#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1XaKksydw9
इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी खूप महत्त्वाची असणार होती. भारतीय संघ मोठा कालावधीनंतर वंडे मालिका खेळण्यासाठी उतरणार होता त्यामुळे संघ कशी कामगिरी करणार आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कशी तयारी करणार यावर सर्वांच्या नजरा होत्या. पण भारताने इंग्लंडवर निर्बळ मालिका विजय नोंदवत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी चांगली तयारी केली आहे.