Rohit Sharma on International Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे रोहित शर्मा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नाचं उत्तर स्वत: रोहित शर्माने नुकत्याच एका पोडकास्टमध्ये दिलं आहे. रोहित म्हणाला मी निवृत्तीचा विचार करत नाहीय आणि बोलताना त्याने टी-२० मधून निवृत्ती घेण्यामागचं एकमेव कारण काय होतं ते सांगितलं.

टी-२० मधून निवृत्तीबाबत फिटर अॅपच्या पोडकास्टमध्ये रोहित शर्मा म्हणाला, नाही नाही, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत नाहीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याचा मी खूप आनंद घेतला आहे. मी १७ वर्षे या फॉरमॅटमध्ये खेळलो आहे आणि मी त्यात चांगली कामगिरी केली. त्यानंतर वर्ल्डकप (२०२४) जिंकला. माझ्यासाठी टी-२० ला अलविदा करत पुढे जाण्याची ही सर्वोत्तम संधी होती कारण T20 मध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करू शकणारे बरेच चांगले खेळाडू आहेत, त्या खेळाडूंना आता पुढे यायला हवे.

हेही वाचा – IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

मला काही वेगळं जाणवलं म्हणून मी टी-२० मधून निवृत्ती घेतली नाही. मला वाटलं हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. मी अजूनही तिन्ही फॉरमॅटमध्ये आरामात खेळू शकतो. म्हणूनच मी नेहमी सांगतो फिटनेस हा तुमच्या विचारात, मनात हवा. तुम्ही तुमच्या मेंदूला कसं ट्रेन करता हे सर्वात महत्त्वाचं आहे.

हेही वाचा – IND vs BAN: मयांक यादव भारतीय संघात, वरुण चक्रवर्ती-जितेश शर्माचं पुनरागमन; बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर

फिटनेस आणि मनावरील नियंत्रण यावर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, माझ्यामते तरी सर्व गोष्टी या मनावर अवलंबून आहेत. मी स्वत खूप आत्मविश्वास असलेला माणूस आहे कारण मला माहितेय की मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. काहीवेळेस हे खूप अवघड असतं, पण अनेकदा मनावर नियंत्रण ठेवत मी ठरवलेली गोष्टी पूर्ण करू शकतो. जर तुम्ही तुमच्या शरीराला सांगितलंत की तू तरूण आहेस, फिट आहेस तू सगळं काही करू शकतोस तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच करू शकता.

रोहित शर्माने भारतासाठी १५९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३१.३४ च्या सरासरीने आणि १५०.८९ च्या स्ट्राईक रेटने ४२३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितने ५ शतकं आणि ३२ अर्धशतकं केली आहेत. रोहितने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताच्या टी-२० संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे.