Rohit Sharma Statement on KL Rahul, Sarfaraz khan and Gill in India playing XI: भारताला बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरूद्ध पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात पुन्हा एकदा भारताच फलंदाज केएल राहुल अपयशी ठरला. बंगळुरू हे त्याचं घरचं मैदान असूनही या सामन्यात तो धावा करू शकला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संघातून बाहेर होण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. याचबरोबर सर्फराझ खानने शतक झळकावले तर दुखापत झालेला शुबमन गिल पुढील कसोटीत पुनरागमन करणार आहे. त्यामुळे केएल राहुल किंवा सर्फराझ खानपैकी कोणाला तरी एकाला प्लेईंग इलेव्हनबाहेर जावे लागले, याबाबत रोहित शर्माने सामन्यानंतर उत्तर दिले आहे.

सर्फराझ खानने दुसऱ्या डावात १५० धावा केल्या आहेत. केएल राहुलने दोन्ही डावांमध्ये ० आणि १२ धावा करत सर्वांनाच निराश केले. दुसऱ्या डावात राहुलने चांगली खेळी करणं संघासाठी गरजेचं होतं. यावर आता रोहित शर्मा म्हणाला, “प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूंच्या त्या सामन्यातील कामगिरीविषयी मी त्या-त्या खेळाडूशी मी बोलत नाही. प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहिती माहिती आहे. त्यांना कल्पना आहे की ते त्यांच्या कारकिर्दीच्या कोणत्या टप्प्यावर उभे आहेत. एक सामना पाहून आम्ही कुठल्याही खेळाडूविषयीचं मत बदलत नाही, बनवत नाही. सर्वांना खूप पूर्वीच स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांना माहितीय संघामध्ये त्यांची जबाबदारी काय आहे. त्यामुळे मला नाही वाटत यापेक्षा मी त्यांना वेगळं काही सांगू शकतो.”

हेही वाचा – IND vs NZ: BCCI ने न्यूझीलंडविरूद्ध पराभवानंतर भारतीय संघात केला मोठा बदल, उर्वरित दोन सामन्यांसाठी संघ केला जाहीर

पत्रकार परिषदेत रोहित शर्मा पुढे म्हणाला, ही खूप साधी गोष्ट आहे, ज्याला संधी मिळेल त्याने योग्य ते प्रयत्न करत आपला प्रभाव पाडायचा आहे. ही एक साधी गोष्ट सुरूवातीपासूनच खेळाडूंना सांगितली गेली आहे आणि खेळण्याची भूक असलेले खेळाडू आहेत, हे पाहून चांगलं वाटतं. दुर्देवाने शुबमन हा सामना खेळू शकला नाही आणि सर्फराझला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने शानदार शतक झळकावलं. ही संघाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे.

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

शुबमन गिलला भारतीय संघासाठी भविष्यातील एक चांगला खेळाडू म्हणून पाहिले जाते. बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी करताना त्याने शतकी खेळीही खेळली. अशा स्थितीत तो फिट असेल तर तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार हे निश्चित दिसते. दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलचे पुनरागमन झाले तर सर्फराझ खान व केएल राहुल यापैकी एकाला संघाबाहेर जावे लागू शकते. सर्फराझने न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाच्या क्षणी शतक झळकावून संघाला संकटातून बाहेर काढले.

याचबरोबर केएल राहुल हा टीम इंडियाचा अनुभवी आणि विश्वासार्ह फलंदाज आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा कोणत्या फलंदाजाला दुसऱ्या कसोटीतून बाहेर ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.