Rohit Sharma will play in the 2027 ODI World Cup says Dinesh Lad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने यावर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषक जिंकला होता. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामनाही पुढे खेळवला जाणार आहे. यावेळीही फायनल खेळण्यासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर वनडे आणि टेस्टमधून निवृत्ती घेऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. दरम्यान, त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

दिनेश लाड यांचे रोहित शर्मावर मोठे वक्तव्य –

दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. दैनिक जागरणशी बोलताना दिनेश लाड रोहितच्या निवृत्तीवर म्हणाले, ‘मी असे म्हणत नाही की रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर निवृत्ती जाहीर करेल, कदाचित तो तसे करू शकेल. कारण जसजसे त्याचे वय वाढत आहे, तसतसे तो कसोटीतून निवृत्ती घेऊ शकतो असे दिसते. याचे कारण हे देखील असू शकते की त्याला एकदिवसीय क्रिकेटसाठी स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवायचे असेल. तथापि, मी वचन देतो की रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळेल. रोहित ज्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहे ते अविश्वसनीय आहे.

रोहित २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार का?

गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाने या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते. मात्र, जेतेपदाच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. रोहित शर्माने या स्पर्धेतील ११ सामन्यांत ५४.२७ च्या सरासरीने ५९७ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकदिवसीय विश्वचषकाचा पुढील हंगाम ३ वर्षांनी म्हणजेच २०२७ मध्ये खेळवला जाणार आहे. त्यानुसार पुढील विश्वचषकापर्यंत रोहित ३९ वर्षांचा होईल. ही स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानच खेळली तर तो ४० वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत रोहितला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याला त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत करावी लागेल.

हेही वाचा – NZ W vs AUS W : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय, भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग झाला खडतर

संपूर्ण विश्वचषकात रोहितने सकारात्मकतेने फलंदाजी केली – दिनेश लाड

२०२३ च्या फायनलमधील पराभवाबद्दल बोलताना दिनेश लाड म्हणाले, ‘फायनलमधील पराभवानंतर रोहित नर्व्हस झाला होता, पण त्याला देशासाठी खेळायचे होते, हे तुम्ही पाहिले असेल. त्याला भविष्यातही देशासाठी खेळायचे आहे. तो दिवस सोडला, तर रोहित शर्माला सुरुवातीपासूनच आत्मविश्वास आहे, संपूर्ण विश्वचषकात रोहित सकारात्मकतेने फलंदाजी करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल, पराभवानंतर तो नर्व्हस झाला कारण तो वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता, सर्व सामने जिंकल्यानंतर इथपर्यंत आले. त्या सामन्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोहित लवकर बाद झाला होता.’