Sachin Tendulkar Keeda Ravi Shastri: सचिन तेंडुलकरच्या नावावर फलंदाजीचे अनेक विक्रम आहेत. १०० आंतरराष्ट्रीय शतके, जागतिक क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय दोन्हीतील सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तेंडुलकरने रचला आहे. पण सचिन तेंडुलकर हा अप्रतिम फिरकी गोलंदाज आहे हे फार कमी जणांना माहीत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याने सचिनच्या फिरकी गोलंदाजीसमोर अनेकदा हार मानली होती.
तेंडुलकरच्या गोलंदाजीमधील कौशल्यावर बोलताना, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री एकदा म्हणाले होते की, सचिनकडे बॉलिंगमध्ये सुद्धा तरबेज होण्यासाठी ‘कीडा’ होता आणि तो फलंदाजी संपल्यानंतर ऑफ-स्पिन आणि लेग-स्पिन सारख्या वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा. तेंडुलकरने २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ४६ आणि १५४ बळी घेतले आहेत.
शास्त्री पुढे म्हणाले की, “आधीच्या टीममध्ये सेहवाग, सचिन, युवराज, रैना यांसारखे अष्टपैलू होते. पण गेल्या ३-४ वर्षात आपल्याकडे या ताकदीचे खेळाडू फार कमी होते त्यामुळेच समतोल बिघडला होता. आता जेव्हा संघात आम्ही अक्षर आणि हुडा सारख्या खेळाडूंना पाहतो तेव्हा बरं वाटतं, ते गोलंदाजी करू शकतात, ते फलंदाजी करू शकतात, हे आश्वासक आहे.”
“देशभरात असे फलंदाज आहेत ज्यांना गोलंदाजी करण्यातही आनंद मिळतो, ज्यांच्याकडे गोलंदाजी करण्यासाठी ‘कीडा’ आहे. जसा तेंडुलकरकडे होता. खरंतर त्याने फलंदाजी पूर्ण केल्यावर त्याचं काम झालं असं तो करू शकत होता पण तो चेंडू घ्यायचा आणि ऑफ-स्पिन, लेग-स्पिन अशा वेगवेगळ्या चेंडूंचा प्रयत्न करायचा. याला कीडा म्हणतात. आता जर असे फलंदाज तुमच्याकडे नाहीच असं म्हणत असाल तर ही आश्चर्यकारक बाब आहे.
India vs Pakistan: आज पावसाची शक्यता किती? राखीव दिवशी मॅच रद्द झाल्यास भारताचं काय नुकसान होणार?
दरम्यान, आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या वेळी आशिया चषकाच्या आठवणींना उजाळा देताना स्टार स्पोर्ट्सवर प्री मॅचमध्ये रवी शास्त्री यांच्या या विधानाची चर्चा झाली होती. आज आशिया चषक २०२३ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सुपर ४ सामन्यातील राखीव दिवसाचा सामना खेळला जाणार आहे. पावसामुळे भारत वि. पाकिस्तानचे दोन सामने रद्द झाले होते.