Sanjay Manjrekar statement Aakash Deep is the best option for Mohammed Shami:: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी बॉर्डर-गावसकर करंडक (बीजेटी) साठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वोत्तम बदली खेळाडू कोण असू शकतो, याबद्दल सांगितले आहे. मात्र, मांजरेकर यांनी एक अट घातली आहे. ते म्हणाले की जर शमी बॉर्डर-गावसकर करंडकासाठी फिट नसेल, तर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आकाश दीप हा सर्वोत्तम पर्याय असेल. अनफिट असल्यामुळे शमी बराच काळ भारतीय संघाबाहेर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर करंडक सुरू होणार आहे. दोन्ही संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडणार आहेत.

संजय मांजरेकर काय म्हणाले?

२७ वर्षीय आकाशने बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत प्रभावी कामगिरी केली आहे. क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान संजय मांजरेकर म्हणाले, “जेव्हा भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाईल, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघात खूप डावखुरे फलंदाज असतील. आकाश राउंड द विकेट गोलंदाजी करतो, त्याच्याकडे अचूक लाईन आणि लेंथवर टिच्चून मारा करण्याची क्षमता आहे. तो १४० नाही तर १३५ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. पण त्याची ताकद अशी आहे की चेंडू अगदी सरळ हवेत येतो. नंतर ऑफ द पिच थोडी-फार हरकत करतो. असे गोलंदाज चांगल्या फलंदाजांना अधिक त्रास देतात. माझ्या मते मोहम्मद शमी फिट नसेल तर आकाश हा त्याचा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. आकाशने फेब्रुवारी २०२४ मध्ये कसोटी पदार्पण केले होते.”

आकाश दीपबद्दल संजय मांजरेकरांची प्रतिक्रिया –

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजपेक्षा आकाश अधिक प्रभावी असल्याचे माजी क्रिकेटपटूचे मत आहे. ते म्हणाले, “डाव्या हाताच्या खेळाडूंविरुद्ध तो सिराजपेक्षाही अधिक प्रभाव पाडत आहे. त्याचे यश पाहून चांगले वाटते. चेन्नई कसोटीत त्याने केवळ ११ षटके टाकली होती. चेन्नईच्या पहिल्या डावात त्याने पाच षटकांत दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्या होत्या. तो एक चांगला भरवशाचा वेगवान गोलंदाज आहे जो डाव्या हाताला फलंदाजांना त्रास देतो. पूर्वी इशांत शर्मा असं करायचा. आता सिराजसोबत आकाश दीप हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो.”

हेही वाचा – CPL 2024 : निकोलस पूरनने मोडला मोहम्मद रिझवानचा विश्वविक्रम, केला ‘हा’ खास पराक्रम

उल्लेखनीय आहे की उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज शमीने गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याने या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. मात्र टाचेच्या दुखापतीमुळे शमीला विश्वचषकानंतर बाहेर पडावे लागले. फेब्रुवारीमध्ये त्याच्या टाचेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. बांगलादेश मालिकेपर्यंत शमी तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. तो पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही हे सध्या निश्चित झालेले नाही.