आपल्या देशात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. काही चाहते तर क्रिकेटलाच आपला धर्म मानतात आणि खेळाडूंना देवता. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंची देशात अफाट लोकप्रियता आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अशाच लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, कधीकधी ही लोकप्रियता मनस्तापाचे कारण ठरू शकते, याची प्रचिती रोहितला नुकतीच आली. मुंबईमध्ये चाहत्यांच्या गर्दीमुळे रोहितला बाहेर पाऊल टाकणेही कठीण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात रोहित शर्मासह काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आशिया चषकासाठी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) रवाना होण्यापूर्वी या खेळाडूंना रिकामा वेळ मिळाला आहे. याचा फायदा घेऊन रोहितने आपल्या मित्राची भेट घेण्याचे ठरवले होते. त्यासाठी १५ ऑगस्टच्या दिवशी तो मुंबईतील ‘द टेबल’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेला. मात्र, तिथून बाहेर पडणे त्याच्यासाठी अशक्य झाले.

रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. याची माहिती मिळताच रोहितच्या हजारो चाहत्यांनी रेस्टॉरंटबाहेर गर्दी केली. ही गर्दी इतकी जास्त होती की, यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या दरम्यान, रोहितने रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण, प्रचंड गर्दी पाहून त्याला आपला विचार बदलावा लागला. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहित अस्वस्थही झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत आतमध्ये पाठवले.

हेही वाचा – “मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद

दरम्यान, येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाला आपली फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यासाठी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये शिबिर घेतले जाणार आहे. त्या शिबिरानंतर भारतीय संघ यूएईला रवाना होईल.