Shahid Afridi on Team India about Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या यजमानपदाचे अधिकार मिळाले आहेत, परंतु सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाणार का? २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. याशिवाय आयसीसी टूर्नामेंट किंवा आशिया कप दरम्यान दोन्ही संघांमधील सामने होतात. बीसीसीआयने आधीच सांगितले आहे की, भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याचा निर्णय भारत सरकार घेईल. या सगळ्या दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी कोणतीही कारणं न देता पाकिस्तानात यावे.

‘आम्हालाही धमक्या आल्या होत्या’ –

शाहिद आफ्रिदी आपल्या फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात स्थानिक मीडियाशी बोलताना म्हणाला, “आम्ही अनेक कठीण परिस्थितीत भारतात गेलो आहोत, आम्हालाही धमक्या आल्या होत्या, तरीही आम्ही भारत दौऱ्यावर गेलो होतो. त्यामुळे आम्हाला त्यांचा हेतू समजला आहे. आम्ही नेहमीच भारताचे समर्थन केले आहे, आम्हाला धमक्या आल्या आहेत, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि सरकारने याबाबत नेहमीच कठोर पावले उचलली आहेत. आता जर बीसीसीआयचा हेतू पाकिस्तानमध्ये येण्याचा असेल तर येतील. जर त्यांचा हेतू यायचा नसेल, तर ते सुरक्षेचे निमित्त देतील.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आशिया कपबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरही यजमानपद पाकिस्तानकडे गेले, परंतु शेवटी ते हायब्रीड मॉडेल अंतर्गत होते, जिथे भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले आणि पाकिस्तानमध्ये फार कमी सामने खेळले गेले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत न आल्यास त्यांच्याशिवाय ही स्पर्धा आयोजित केली जाईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावेळी स्पष्ट केले आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने असेही म्हटले आहे की, पाकिस्तान भारतात होणाऱ्या आयसीसी टूर्नामेंटमध्येही सहभागी होणार नाही.

हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदकावर नाव कोरल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची स्पर्गा आहे. कारण ते २९ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर एका मोठ्या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करत आहेत. १९९६ मध्ये, त्यांनी एकदिवसीय विश्वचषक सह यजमानपद भूषवले होते. २००८ पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. पाकिस्तानने आयसीसीच्या विविध स्पर्धांसाठी भारताचा दौरा केला असताना, या दोघांमधील द्विपक्षीय मालिका बऱ्याच काळापासून स्थगित आहे.