WTC Points Table After South Africa Beat Bangladesh in Asia: दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात बांगलादेशातील ढाका येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेशला हरवून इतिहास लिहिला आहे. ढाका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव करून संघाने गेल्या दहा वर्षांत आशिया खंडातील पहिला सामना जिंकला. संघाच्या या विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये बदल झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या विजयासह कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील अंतिम सामन्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत जाण्यासाठी त्यांच्या उर्वरित ६ सामन्यात ५ विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यात एक विजय तर त्यांनी मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने २०१४ मध्ये आशिया खंडात अखेरचा सामना जिंकला होता. २०१४ मध्ये श्रीलंकेने गॅले येथे झालेल्या सामन्यात अखेरचा विजय मिळवला होता. यानंतर आशियात झालेल्या सर्व ९ कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज

भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी आफ्रिकेचा संघही आता प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामील झाला आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या या विजयामुळे भारताचं टेन्शनही वाढलं आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात काईल व्हेरेन याने शतक झळकावले तर वियान मुल्डरने पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. तर रबाडाने ९ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली. तर बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ९७ धावा केलया. तैजुल इस्लामने ५ विकेट्स घेतले.

हेही वाचा – Highest T20I Total: झिम्बाब्वेचा टी-२० मध्ये विश्वविक्रम! १२० चेंडूत ३४४ धावा, ३० चौकार आणि २७ षटकार; धावांचा महापूर

बांगलादेशविरुद्धच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावरून थेट चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. यापूर्वी संघाच्या गुणांची टक्केवारी ३८.८९ होती, जी आता ४७.६२ वर पोहोचली आहे. चितगाव येथे होणारा दुसरा सामनाही संघाने जिंकला तर भारत आणि ऑस्ट्रेलियापाठोपाठ त्यांनाही अंतिम फेरीत जाण्याची संधी आहे.

गुणतालिकेतील अव्वल तीन संघ म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आहेत. सध्या ६८.०६ या गुणांच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे. संघाची टक्केवारी ७० च्या पार होती परंतु, बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला, ज्याचा भारताला फटका बसला. ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० च्या टक्केवारीसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत श्रीलंका संघ तिसऱ्या स्थानावर आहे, ज्यांची टक्केवारी ५५.५६ आहे.

हेही वाचा – VIDEO: “मी ४० वर्षांचा झालोय हे कळायला…”, केएल राहुलसाठी बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल झाला नेट बॉलर, पाहा काय म्हणाला?

भारताला न्यूझीलंडविरूद्ध दोन्ही कसोटी जिंकणं आवश्यक

सध्या भारतीय संघ WTC गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असला तरी न्यूझीलंडने भारताच्या अडचणी वाढवल्या आहेत. न्यूझीलंडने बेंगळुरू कसोटीत भारतीय संघाचा पराभव करून मोठा अपसेट निर्माण केला. आता टीम इंडियाला अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकावे लागणार आहेत. याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल तेव्हा त्यातील किमान दोन सामने भारताला जिंकावे लागतील, तरच अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध जिंकला तरी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे फार कठीण काम असणार आहे.