IND vs AUS Sunil Gavaskar Angry on Team India: भारताने ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका १० वर्षांनी गमावली. भारताच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर चांगलेच संतापले आहेत. गावस्करांनी कोणाचंही नाव न घेता संपूर्ण भारतीय संघावर ताशेरे ओढले आहेत. संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले. भारताने प्रत्येक सामन्यात चांगलं पुनरागमन केलं पण विजय मिळवण्यात मात्र अपयशी ठरले.
सुनील गावस्कर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते टीम इंडियाच्या खेळाडूंना सुनावताना दिसत आहेत. टीम इंडियाच्या मालिका पराभवानंतर सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटलं, “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेटबद्दल काही माहित नाही. आम्ही फक्त टीव्हीसाठी बोलतो आणि पैसे कमवतो, आमचं ऐकू नका, आम्ही कोणीच नाही. एका कानाने ऐका, दुसऱ्या कानाने सोडून द्या.”
हेही वाचा – IND vs AUS: सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मी भारतीय आहे म्हणून…”
सुनील गावस्करांच्या या वक्तव्यावरून त्यांनी रोहित शर्माला सुनावल्याचं चाहते म्हणत आहेत. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. त्याने कोणाचंही नाव न घेता माजी क्रिकेटपटू आणि पत्रकारांवर वक्तव्य केलं होतं. रोहित म्हणाला होता की, “जे आत माईक, लॅपटॉप किंवा पेन घेऊन बसले आहेत ते ठरवणार नाहीत की आम्ही काय करायचं. काय बरोबर आणि काय चूक हे आम्हालाही कळतं. मी दोन मुलांचा बाप आहे, त्यामुळे मला काय करायचं आहे, याची थोडीफार कल्पना आहे.”
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुनील गावस्कर यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला बेजबाबदार शॉट्स खेळल्याबद्दल खडसावले होते. ऋषभ पंतने हा शॉट खेळला तेव्हा टीम इंडियाला मोठी भागीदारी करणं आवश्यक होते. सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतला सुनावत म्हटलं, ‘मूर्खासारखा फटका’ खेळला आहे. सुनील गावस्कर यांच्या मते, ऋषभ पंतने अशा वेळी विकेट गमावली जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती. भारताच्या मालिका पराभवावरील वक्तव्याप्रमाणे सुनील गावस्करांचं ऋषभ पंतवरील वक्तव्य असलेला व्हीडिओही व्हायरल झाला होता.
सुनील गावस्करांनी पंत बाद झाल्यानंतर कॉमेंट्री करताना म्हटलं होतं, मूर्ख मूर्ख मूर्ख! तुझ्यासाठी तिथे दोन फिल्डर उभे केले आहेत आणि तरीही तू तिथेच फटका खेळला. तुझा आधीचा फटका चुकला होता आणि आता तू कुठे बाद झाला आहेस बघ. तू डीप थर्ड मॅनवर झेलबाद झाला आहेस.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्याने भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न अधुरं राहिलं आहे. बारताा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सिडनी कसोटीत विजय मिळवणं महत्त्वाचं होतं. पण भारताने सिडनी कसोटी ६ विकेट्सने गमावली आणि परिणामी ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
© IE Online Media Services (P) Ltd