Suryakumar Yadav handing over the trophy to Jitesh Sharma and Rinku Singh : भारताने टी-२० मालिकेतील पाचव्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची ही पहिली टी-२० मालिका होती. मालिका जिंकल्यानंतर जेव्हा सूर्यकुमार यादवला ट्रॉफी देण्यात आली, तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनीने सुरू केलेली प्रथा सुरू ठेवली. त्याने मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंच्या हाती ट्रॉफी सोपवली. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक सूर्याच्या कृतीचे कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक, ट्रॉफी मिळाल्यानंतर, सूर्या थेट रिंकू सिंग आणि जितेश शर्माकडे गेला, जे चॅम्पियन प्लेकार्डच्या मागे आणि सर्व खेळाडूंच्या मध्ये उभे होते. रिंकू आणि जितेश यांनी मिळून ट्रॉफी उचलली. दोघेही खूप आनंदी दिसत होते. रिंकूने या मालिकेत पाच डावात ५२.५० च्या सरासरीने आणि १७५ च्या स्ट्राईक रेटने १०५ धावा केल्या, तर जितेश शर्माला शेवटचे दोन टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने २९.५० च्या सरासरीने आणि १६८.५७ च्या स्ट्राईक रेटने ५९ धावा केल्या. दोन्ही सामन्यात त्याने छोट्या पण महत्त्वपूर्ण इनिंग खेळल्या. रिंकूने त्याच्या मॅच फिनिशिंग कौशल्याने सर्वांना प्रभावित केले.

सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ही एक चांगली मालिका होती. मुलांनी ज्या पद्धतीने आपले कौशल्य दाखवले, ते कौतुकास्पद होते. आम्हाला निर्भयपणे खेळायचे होते. मी माझ्या खेळाडूंना जे योग्य आहे ते करा आणि त्यांच्या खेळाचा आनंद घ्या, असे सांगितले होते आणि त्यांनी तसे केले. याचा मला खूप आनंद आहे. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर खेळला असता, तर ‘अॅड ऑन’ झाला असता. २०० हून अधिक धावांचा पाठलाग करणे चिन्नास्वामीसाठी सोपे आहे. येथे एक १६०-१७५ ‘ट्रिकी स्कोअर’ आहे. १० षटकांनंतर मी मुलांना सांगितले की या सामन्यात आता काट्याची टक्कर होईल.’

हेही वाचा – IPL 2024 : सीएसके संघात अंबाती रायुडूची जागा कोण घेणार? अश्विनने सुचवले त्रिशतक झळकावणाऱ्या ‘या’ खेळाडूचे नाव

सूर्यकुमार पुढे म्हणाला, ‘मालिका जिंकून छान वाटत आहे. कर्णधार म्हणून मालिका जिंकणे चांगले आहे आणि त्यामुळे जीवनात एक नवीन कोन आला आहे. मी अर्शदीप सिंगला कठीण परिस्थितीत गोलंदाजी करताना पाहिले आहे. त्याने फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अनेकदा डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली आहे. म्हणूनच मी त्याचे षटक राखून ठेवले होते. टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे असे प्रत्येकजण म्हणतो. फलंदाज सामने जिंकवतात पण गोलंदाज मालिका जिंकवतात.’

हेही वाचा – MS Dhoni : शाई होपला माहीच्या गुरुमंत्राचा झाला फायदा, शतक झळकावून वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध मिळवून दिला विजय

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६० धावा केल्या होत्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५३ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ आणि बेन द्वारशुइसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. १६१ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला २० षटकांत ८ बाद १५४ धावांच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटने सर्वाधिक ५४ धावा केल्या, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. भारताकडून मुकेश कुमारने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav handing over the trophy to jitesh sharma and rinku singh after india won the t20 series against australia vbm
Show comments