आज होणार्‍या भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकाच्या सामन्यासाठी विराट कोहली आणि बाबर आझमची सेना सज्ज झाली आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने हॉटस्टारवर पाहता येईल. विश्वचषकातील भारताचा उत्कृष्ट विक्रम पाहता, पाकिस्तान संघाचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी एक मोठे विधान केले आहे. पाकिस्तान कितीही चांगला खेळला, तरी भारताने चूक केली नाही तर आम्हाला सामना जिंकणे कठीण होईल, असे मत लतीफ यांनी दिले.

पाकिस्तान संघ भारताविरुद्धच्या सामन्याचे दबाव सहन करू शकत नाही आणि दडपणाखाली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याच वेळी, भारतीय संघ अशा प्रसंगी स्थिर फलंदाजी करतो.

खलीज टाईम्सशी संवाद साधताना लतीफ म्हणाले, ”भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या चुकीच्या निर्णयामुळे परिस्थिती थोडी वेगळी ठरू शकते. माझ्या मते पाकिस्तान कितीही चांगला खेळला तरी भारतीय खेळाडूंनी चुका केल्या नाहीत, तर पाकिस्तानला सामना जिंकणे कठीण होईल. विराट कोहली नाणेफेक जिंकल्यावर काय करतो आणि कोणत्या संघासह तो मैदानात उतरतो हे पाहावे लागेल.”

हेही वाचा – T20 WC : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विराट ‘या’ मुंबईकर क्रिकेटपटूला ठेवणार संघाबाहेर?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने वर्चस्व राखले आहे. यात भारताने ६ सामने जिंकले, पाकिस्तानला फक्त एकदाच जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागला नाही. दुसरीकडे, टी-२० विश्वचषकातही पाकिस्तानविरुद्ध भारताचे वर्चस्व आहे. पाकिस्तानी संघाने टी-२० एकदिवसीय विश्वचषकात भारतासमोर कधीही विजयाची चव चाखली नाही. दोन्ही संघ ५ वेळा भिडले आहेत आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. भारतीय संघ आता विजयी षटकार मारण्याकडे लक्ष देईल.

Story img Loader