पीटीआय, अ‍ॅडलेड : भारतीय क्रिकेट संघाचा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेला बाद फेरीचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपुराच पडला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही प्रमुख आघाडय़ांवर केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचे दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अ‍ॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी साकारलेल्या उत्कृष्ट अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने गुरुवारी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा १० गडी राखून पराभव केला. यासह भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याच्याही आशा संपुष्टात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅडलेड ओव्हलच्या संथ खेळपट्टीवर भारतीय संघ सुरुवातीला अडचणीत सापडला होता. मात्र, हार्दिक पंडय़ाने (३३ चेंडूंत ६८ धावा) अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६८ धावांची मजल मारता आली. मात्र, हेल्स आणि बटलर या सलामीवीरांनी हे आव्हान १६ षटकांतच पार करत इंग्लंडला अंतिम फेरीत पोहोचवले. हेल्सने ४७ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांसह नाबाद ८६ धावांची, तर कर्णधार बटलरने ४९ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ८० धावांची खेळी साकारली. भारताचे सर्वच गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.

इंग्लंडकडून झालेल्या या लाजिरवाण्या पराभवामुळे भारताचे २००७ नंतर पहिल्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र ‘आयसीसी’च्या स्पर्धा जिंकण्यात भारताला यश आलेले नाही. २०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना, २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना, २०१७च्या चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना, तसेच २०१५ आणि २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना, हे बाद फेरीचे सर्व सामने भारतीय संघाने गमावले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाला खेळ उंचावता आला नाही.

पॉवरप्लेमध्ये पुन्हा संथ फलंदाजी

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची सुरुवात पुन्हा संथ आणि अडखळती झाली. भारताने यंदाच्या स्पर्धेत पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये केवळ सहाच्या धावगतीने धावा केल्या. या सामन्यातही सहा षटकांअंती भारताची १ बाद ३८ अशी स्थिती होती. भारताचा सलामीवीर केएल राहुल पुन्हा महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. त्याला केवळ ५ धावांवर ख्रिस वोक्सने बाद केले. यानंतर धावांसाठी झगडणारा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही इंग्लंडच्या गोलंदाजांनी जखडून ठेवले.

रोहित, सूर्यकुमार माघारी

रोहितला या संपूर्ण स्पर्धेत छाप पाडता आली नाही. इंग्लंडविरुद्ध त्याने काही चांगले फटके मारले, पण तो पूर्णपणे लयीत दिसला नाही. अखेर ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित (२८ चेंडूंत २७) माघारी परतला. सॅम करनने त्याचा उत्कृष्ट झेल पकडला. तसेच आपल्या थक्क करून सोडणाऱ्या फटक्यांमुळे चर्चेत असलेला मुंबईकर सूर्यकुमार यादवही (१० चेंडूंत १४) मोठी खेळी करू शकला नाही. त्याने बेन स्टोक्सच्या सलग दोन चेंडूंवर अनुक्रमे षटकार व चौकार लगावला. मात्र, पुढील षटकात आदिल रशीदच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यामुळे भारताची १२व्या षटकात ३ बाद ७५ अशी स्थिती झाली.

हार्दिक, कोहलीने सावरले

लयीत असणारा कोहली आणि हार्दिक यांनी मिळून भारताचा डाव सावरला. कोहलीने आपल्या आवडत्या अ‍ॅडलेडच्या मैदानावर ४० चेंडूंत ५० धावांची खेळी केली. तसेच त्याने हार्दिकसह चौथ्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी रचली. हार्दिकने सुरुवातीच्या १५ चेंडूंत केवळ १३ धावा केल्या होत्या. मात्र, त्याने अखेरच्या चार षटकांत इंग्लंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने पाच षटकार आणि चार चौकारांची आतषबाजी करताना ३३ चेंडूंत ६३ धावा फटकावल्या. त्यामुळे भारताला १७० धावांसमीप पोहोचता आले.

भारतीय गोलंदाज निष्प्रभ

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत स्विंगचा चांगला वापर केला होता. त्यानंतर मधल्या आणि अखेरच्या षटकांत संथ चेंडूंचे (स्लोअर वन) उत्तम मिश्रण केले. फिरकीपटूंनी अचूक मारा केला. भारतीय गोलंदाज मात्र यात कमी पडले. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात बटलरने तीन चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर हेल्सनेही आक्रमकता दाखवली. त्यामुळे पॉवरप्लेच्या सहा षटकांतच इंग्लंडची बिनबाद ६३ अशी धावसंख्या होती. खेळपट्टीकडून फिरकीपटूंना मदत मिळत होती. मात्र, रविचंद्रन अश्विन (२ षटकांत २७ धावा) आणि अक्षर पटेल (४ षटकांत ३० धावा) यांना प्रभाव पाडता आला नाही. याचा फायदा घेत बटलर आणि हेल्स जोडीने इंग्लंडला विजय मिळवून दिला.

जोस बटलर आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी १७० धावांची अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धामधील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. इंग्लंडने या सामन्यात १६९ धावांचा यशस्वी पाठलाग केला. अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावरील ट्वेन्टी-२० सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. 

भारतीय फलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १२० पैकी ४२ चेंडू (सात षटके) निर्धाव खेळले. एकूण चेंडूंपैकी ३५ टक्के चेंडूंवर धावा करण्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले.

संघांची विविध टप्प्यांतील धावसंख्या

    भारत   इंग्लंड

१-६ षटके   १ बाद ३८   बिनबाद ६३   

७-१५ षटके  २ बाद ६२          बिनबाद ९३

    (एकूण ३ बाद १००)      (एकूण बिनबाद १५६)

१६-२० षटके ३ बाद ६८          बिनबाद १४ (एक षटक)   

                     (एकूण ६ बाद १६८)       (एकूण बिनबाद १७०)

भारताच्या विराट कोहलीने या सामन्यात ५० धावांची खेळी केली. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य फेरीतील हे कोहलीचे तिसरे अर्धशतक ठरले. ही कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. त्याने यापूर्वी २०१४मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७२, तर २०१६मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ८९ धावांची खेळी केली होती.

सलामीवीरांचे अपयश

कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल या भारतीय सलामीवीरांनी यंदाच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात निराशाजनक कामगिरी केली. रोहितने सहा सामन्यांत मिळून १०९ चेंडूंत ११६ धावाच केल्या. त्याची धावगती केवळ १०६ इतकी होती. दुसरीकडे, राहुलने सहा सामन्यांत १२०च्या धावगतीने केवळ १२८ धावा केल्या. रोहितला एक (नेदरलँड्सविरुद्ध), तर राहुलला दोनच (बांगलादेश व झिम्बाब्वेविरुद्ध) अर्धशतके करता आली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ६ बाद १६८ (हार्दिक पंडय़ा ६३, विराट कोहली ५०, रोहित शर्मा २७, सूर्यकुमार यादव १४; ख्रिस जॉर्डन ३/४३, आदिल रशीद १/२०)

पराभूत वि. इंग्लंड : १६ षटकांत बिनबाद १७० (अ‍ॅलेक्स हेल्स नाबाद ८६, जोस बटलर नाबाद ८०)

  • सामनावीर : अ‍ॅलेक्स हेल्स
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup cricket tournament india challenge ends england semi finals ysh
Show comments