Yuvraj’s reaction on Rohit-Hardik : हार्दिक पंड्या आगामी हंगामात पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने माजी कर्णधार रोहित शर्माची जागा घेतली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचही जेतेपदे जिंकली असली, तरी आता हा संघ हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. मात्र, यानंतर मुंबईच्या काही खेळाडूंनी कोणाचेही नाव न घेता सोशल मीडियावर अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली. रोहितच्या चेहऱ्यावरही नाराजी दिसली होती. मुंबईच्या कोणत्याही खेळाडूने हार्दिकचे सोशल मीडियावर स्वागत केले नव्हते. आता याप्रकरणी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे प्रतिक्रिया समोर आली आहे.

रोहित आणि हार्दिक यांच्यातील कथित वादाबद्दल विचारले असता, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला, ‘जेव्हा दोन खेळाडू एकत्र खेळतात, तेव्हा अशा गोष्टी घडत राहतात. त्यांच्यात काही वाद असेल तर त्यांनी नक्की बसून त्यावर चर्चा करावी. यापूर्वी हार्दिक जेव्हा मुंबई इंडियन्सकडून खेळला होता, तेव्हा रोहित त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्यात यशस्वी ठरला होता. विशेषतः गोलंदाजीच्या बाबतीत आणि तो हार्दिकच्या कामाच्या ताणाबद्दल खूप काळजी घेत होता.’

युवी पुढे म्हणाला, ‘हार्दिकने डेथ ओव्हर्समध्ये नेहमीच चांगली फलंदाजी केली आहे. गुजरातसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो विशेषज्ञ फलंदाजासारखा खेळला.’ एकदिवसीय विश्वचषक २०२३ दरम्यान घोट्याला दुखापत झाल्यामुळे हार्दिक खेळताना दिसला नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्याने तो वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. मात्र, त्याने खूप चांगली रिकव्हरी दाखवली आणि लवकरच तो मैदानात परतताना दिसणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही.

हेही वाचा – IND vs ENG : मुंबई इंडियन्सने पोस्टरमधून रोहित शर्माला वगळल्याने चाहते संतापले; म्हणाले…

आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. त्याला आगामी हंगामासाठी फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे रोहितचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपला. २०२२ ते २०२३ पर्यंत गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांमध्ये पंड्याने ३७.८६ च्या सरासरीने आणि १३३ च्या स्ट्राइक रेटने ८३३ धावा केल्या. यामध्ये सहा अर्धशतके आणि नाबाद ८७ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. त्याने संघासाठी ११ विकेट्सही घेतल्या, १७ धावांत तीन विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

Story img Loader