Team India how many wins need to qualify for WTC Final 2025 : भारतीय क्रिकेट संघ पुढील आठवड्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असतील. भारतीय क्रिकेट संघ २०२३-२५ ​​च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कसा पोहोचेल हे दोन सामने ठरवतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय संघाला किती सामने जिंकणे आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताची सध्या काय स्थिती आहे?

भारतीय क्रिकेट संघ सध्या ६८.५२% च्या विजयाच्या टक्केवारीसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत वेस्ट इंडिजचा १-० अशा फरकाने तर इंग्लंडचा ४-१ अशा फरकाने पराभव केला आहे. तसेच, संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता भारताला बांगलादेशविरुद्ध २, न्यूझीलंडविरुद्ध ३ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलिया ६२.५% गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, सध्याचा चॅम्पियन न्यूझीलंड ५०% विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियाला आता आणखी १० कसोटी सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये चांगली कामगिरी करूनच संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकतो.

भारताला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती सामने जिंकण्याची गरज?

आयसीसीच्या अहवालानुसार, भारताला विजयाची टक्केवारी ६०% च्या वर ठेवण्यासाठी पुढील १० पैकी किमान ७ कसोटी सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत बांगलादेशविरुद्ध २ सामने आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत पाच कसोटी सामने खेळवले जातील. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात शेवटच्या दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यामुळे भारताचा आत्मविश्वासही वाढला आहे.

हेही वाचा – इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट

मात्र, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला टॉप-२ मध्येच राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भारताने ५ सामने जिंकले आणि १ अनिर्णित राहिला तरीही भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. त्याच वेळी, जर भारताने ६ विजय नोंदवले, तर त्याची विजयाची टक्केवारी ६४.०३% होईल, ज्यामुळे संघाचे अंतिम फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित होईल.

हेही वाचा – २६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

इतर संघांची स्थिती काय आहे?

ऑस्ट्रेलिया ७ सामने बाकी असताना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४ सामने जिंकावे लागतील किंवा ३ सामने जिंकावे लागतील आणि १ सामना अनिर्णित राखावा लागेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचे ८ सामने बाकी असताना तिसऱ्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडला ६ सामने जिंकावे लागतील किंवा ५ सामने जिंकावे लागतील आणि १ अनिर्णित राखावा लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india how many wins need to qualify for world test championship final 2025 vbm