India vs South Africa 1st Test Match: भारताचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मंगळवारपासून (२६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो संघाची धुरा सांभाळणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत हिटमॅनने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्याने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याचे संकेतही दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पत्रकार रोहितला त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल सतत विचारत होते. तो टी-२० विश्वचषक खेळणार की नाही हे त्याच्याकडून जाणून घ्यायचे होते. एका पत्रकाराने रोहितला विचारले, “पुढील एकदिवसीय विश्वचषक चार वर्षांनंतर आहे. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका आणि पुढील सहा महिन्यांत टी-२० विश्वचषक आहे. यात सीनियर खेळाडूंनी बाजी मारली तर काही प्रमाणात फायदा होईल का? तुम्ही किंवा विराट कोहली याचा विचार करत आहात का?” यावरून त्याने सूचक उत्तर दिले.

आम्ही इथे जिंकलो तर सगळ्या गोष्टी सोप्या होतीलरोहित शर्मा

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर रोहित म्हणाला, “आम्ही अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत येत आहोत. अजून इथे जिंकलो नाही. आम्ही येथे जिंकलो तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि ही खूप मोठी घटना असेल. विश्वचषकातील पराभवाचे दुःख ते दूर करेल की नाही हे मला माहीत नाही, कारण विश्वचषक हा विश्वचषक आहे. या मालिकेची त्याच्याशी तुलना करणे कठीण आहे, इथे जर जिंकलो तर मनाला थोडे बरे वाटेल. जर तुम्ही एवढी मेहनत करत असाल तर तुम्हाला काहीतरी मोठे करणे हवे असते. फक्त सीनियरच नाही तर सगळेच खेळाडू यासाठी मेहनत घेत असतात.”

या प्रश्नावर रोहित शर्मा चिडला

यानंतर पत्रकाराने पुढे विचारले, “तुम्हीही टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक आहात का?” या प्रश्नावर हिटमॅन चिडला. तो म्हणाला, “क्रिकेट खेळण्याची उत्कंठा प्रत्येकामध्ये असते. प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागते. जिथे संधी मिळेल तिथे देशाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी ही सर्वांची असते. संघात जिथे चुकत असेल तिथे नीट केले पाहिजे. मला माहित आहे तुम्ही काय विचारायचा प्रयत्न करत आहात, पण योग्य वेळी तुम्हाला उत्तर ते मिळेल आणि ते सविस्तर उत्तर असेल.”

हेही वाचा: IND vs SA 1st Test: “जर हा रोहित-कोहलीचा शेवटचा आफ्रिकन दौरा असेल तर…”, द. आफ्रिकेच्या अ‍ॅलन डोनाल्डचे मोठे विधान

रोहितच्या नेतृत्वाखाली दोन फायनल हरले

रोहित शर्मा २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. २०११च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर २०१३मध्ये जेव्हा टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा तो सलामीचा फलंदाज होता. त्यानंतर भारताने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २०२३मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दोन फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india is desperate for a big win after the wc defeat the captain said we are working hard we want something avw