भारतीय संघ सध्या विंडिजमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला असून दुसरा आणि अखेरचा सामना ३० ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यातून भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याने माघार घेतली आहे. भारतीय लष्करी सेवा देण्यासाठी त्याने क्रिकेटमधून २ महिन्यांची विश्रांती घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेतून धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पण या दरम्यान भारतीय संघाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावून घ्यायला हवी, असे सूचक वक्तव्य माजी कर्णधार सौरव गांगुली याने केले आहे.

“भारतीय संघ आणि क्रिकेटला आता धोनी संघात नसल्याची सवय लावून घ्यायला हवी. धोनी शेवटच्या श्वासापर्यंत क्रिकेट खेळणार नाहीये. आताच्या त्याच्या वयाकडे पाहता तो फार काळ मैदानावर क्रिकेट खेळताना दिसेल असे वाटत नाही. निवृत्तीबाबतचा निर्णय धोनीने घ्यायचा आहे, पण भारतीय संघाने मात्र धोनी मैदानावर नसण्याची सवय लावून घ्यायला हवी”, असे गांगुली म्हणाला.

“प्रत्येक खेळात महान खेळाडूच्या निवृत्तीची एक वेळ येते. हा खेळ आहे. फुटबॉलमध्ये महान खेळाडू मॅराडोना यांच्यापेक्षा उत्तम खेळाडू मी आजपर्यंत पाहिलेला नाही. पण त्यांनाही निवृत्त व्हावे लागले. क्रिकेटमध्येदेखील तेंडुलकर, लारा, ब्रॅडमन यांना निवृत्ती स्वीकारावी लागली. हा खेळाचा नियमच आहे आणि तो प्रत्येकाला पाळावाच लागणार आहे. कधी ना कधी धोनीलाही क्रिकेटमधून निवृत्त व्हावेच लागेल. त्यामुळे भारतीय संघाने धोनीशिवाय क्रिकेट खेळण्याची सवय लावून घेतली पाहिजे”, असे गांगुलीने नमूद केले.

Story img Loader