Team India on T20 World Cup: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवानंतर ३६ वर्षीय रोहित शर्मा आणि ३५ वर्षीय विराट कोहली यांचा हा शेवटचा विश्वचषक असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र, दोघेही भविष्यात काही आयसीसी स्पर्धाही खेळू शकतात. यामध्ये पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणार असून हे दोन्ही देश संयुक्त यजमानपद भूषवणार आहेत. रोहित आणि विराट या दोघांनाही त्या स्पर्धेत खेळण्याची आणि भारताचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. १० वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. ती म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी.

विराट टी-२० आणि रोहित वन डे वर्ल्ड कप जिंकू शकला नाही

अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित आणि विराट दोघेही भावूक झाले होते. त्यांच्या बोलण्यातून असे वाटत होते की, ते पुढच्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. विराटने २०११ मध्ये टीम इंडियासोबत विश्वचषक जिंकला होता. २०२३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाचाही तो एक भाग होता, पण विराटला टी-२० विश्वचषक कधीच जिंकता आलेला नाही.

त्याच वेळी, रोहित २००७ मध्ये टी-२० चॅम्पियन बनलेल्या संघाचा एक भाग होता आणि त्याने २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली होती, परंतु तो कधीही एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकला नाही. अशा परिस्थितीत दोघांच्या कारकिर्दीत प्रत्येकी एक आयसीसी ट्रॉफी सध्यातरी नाहीये. मात्र, हे दोघेही टी-२० संघात पुनरागमन करू शकतात.

हेही वाचा: IPL 2024: गौतम गंभीरचे कोलकता नाईट रायडर्समध्ये पुनरागमन, आयपीएल २०२४मध्ये बजावणार ‘ही’ भूमिका

रोहित-विराटने गेल्या एक वर्षापासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही

रोहित आणि विराट या दोघांनी २०२२च्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीपासून भारतासाठी या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. १० नोव्हेंबर २०२२ रोजी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तेव्हापासून दोघेही या फॉरमॅटमधून गायब आहेत, तर भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या फॉरमॅटमध्ये नवीन खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात आहे. मात्र, टी-२० विश्वचषक खेळण्याचा निर्णय दोघांच्या कामगिरीवर अवलंबून असेल आणि तो आयपीएल २०२४ नंतरच घेतला जाऊ शकतो. एकदिवसीय विश्वचषकात रोहित आणि विराटचा फॉर्म पाहता त्यांचे पुनरागमन आश्चर्यकारक ठरणार नाही.

दोघांनी अद्याप टी-२० मधून निवृत्ती घेतलेली नाही

हे देखील शक्य आहे कारण, जर दोघेही परतले नसते तर त्यांची निवृत्ती जाहीर होऊ शकली असती. त्याचवेळी बीसीसीआय संघ निवडीच्या वेळी रोहित आणि विराट टी-२० मध्ये निवडीसाठी उपलब्ध नसल्याची विधाने सातत्याने करत आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी आयपीएल या दोघांसाठी टी-२०मध्ये पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा एक भाग आहे.

गेल्या काही काळापासून भारताच्या टी२० संघात बरेच बदल झाले आहेत. संघातील कोणाचेही स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत रोहितला सलामीवीर म्हणून आणले जाऊ शकते आणि शुबमन गिल त्याच्याबरोबर सलामी करताना दिसू शकतो. त्यानंतर यशस्वी जैस्वाल तिसऱ्या क्रमांकावर, विराट चौथ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो.

हेही वाचा: गौतम गंभीरने त्याचा आवडता बॅटिंग पार्टनर सेहवाग, तेंडुलकर नसून ‘या’ खेळाडूचे घेतले नाव; म्हणाला,“लोकांना वाटते की…”

आयपीएल २०२४ नंतर निर्णय घेतला जाऊ शकतो

ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करण्यास सक्षम आहे की नाही हे पाहणे देखील महत्वाचे असेल. सौरव गांगुलीसह अनेक क्रिकेटपटूंचे विधान आले आहे की, पंत लवकरच क्रिकेट खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत पंतची आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिल्यास तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात सामील होऊ शकतो आणि सहाव्या स्थानावर दावा करू शकतो.

हार्दिक आणि अक्षर-जडेजापैकी एक फिरकी अष्टपैलू संघाचा भाग असू शकतो. याशिवाय सिराज, बुमराह आणि कुलदीपला संधी मिळू शकते. इशान किशन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई यांच्यापैकी कोणाला संघात स्थान मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

एकदिवसीय विश्वचषकात रोहित-विराट जबरदस्त फॉर्मात होते

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही नुकत्याच खेळल्या गेलेल्या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती आणि ते सर्वोच्च दोन सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. विराटने ११ सामन्यांच्या ११ डावांमध्ये ९५.६२च्या सरासरीने आणि ९०.३२च्या स्ट्राईक रेटने ७६५ धावा केल्या, तर रोहितने ११ डावांमध्ये ५४.२७च्या सरासरीने आणि १२५.९५च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने ५९७ धावा केल्या.

हे दोघेही आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. कोहलीच्या ११५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५२.७३च्या सरासरीने आणि १३७.९६ च्या स्ट्राइक रेटने ४००८ धावा आहेत, तर रोहितच्या १४० टी-२० डावांमध्ये ३१.३२च्या सरासरीने आणि १३९.२४च्या स्ट्राइक रेटने ३८५३ धावा आहेत. विराटने एक शतक आणि ३७ अर्धशतकं झळकावली आहेत, तर रोहितनं चार शतकं आणि २९ अर्धशतकं झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india will rohit virat make a comeback in t20 world cup decision will be taken after performance in ipl avw
Show comments