Indian team has become the first team to win the most number of T20 International matches : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका जिंकली. त्याचबरोबर भारतीय संघाने मालिकेत ३-१अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही केला. सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा विशेष पराक्रम केला आहे. टीम इंडियाने रायपूरमध्ये चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता टीम इंडियाने सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने आतापर्यंत एकूण २१३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी १३६ जिंकले आहेत आणि ६७ गमावले आहेत. तसेच पाकिस्तानने २२६ पैकी १३५ सामने जिंकले असून ८२ सामने गमावले आहेत. हा विक्रम भारताच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर होता. मात्र मालिकेतील चारपैकी तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने हा विक्रमावर आपल्या नावावर केला आहे.

भारत आणि पाकिस्तान नंतर, न्यूझीलंडचा संघ सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने २०० पैकी १०२ सामने जिंकले असून ८३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. १८२ टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने ९५ जिंकले असून ७९ गमावले आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने १७१ पैकी ९५ जिंकले आणि ७२ गमावले.

हेही वाचा – IPL 2024 : “माझी निवड होईल की नाही याची…”; आयपीएलच्या लिलावाबद्दल रचिन रवींद्रचे मोठे विधान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चौथ्या सामन्याबद्दल बोलायचे, तर भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ ७ गडी गमावून केवळ १५४ धावा करू शकला आणि २० धावांनी सामना गमावला.

हेही वाचा – IND vs AUS 4th T20: रिंकू-अक्षरच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताचा ऑस्ट्रेलियावर २० धावांनी विजय, ३-१ ने जिंकली मालिका

भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ३७ आणि जितेश शर्माने ३५ धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड ३२ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉरिसने तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ १३ धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या २०० धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian cricket team has become the first team to win the most number of t20 international matches vbm
Show comments