मुंबई : साधारण दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारताला भारतात हरविणे हे सर्वांत मोठे आव्हान मानले जात होते. मात्र, टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने भारताच्या मायदेशातील वर्चस्वाला केवळ धक्का दिला नाही, तर ते पूर्णपणे खालसा केले. पहिल्या दोन कसोटीतील पराभवामुळे आधीच मालिका गमावलेल्या भारतीय संघाला विजयी सांगतेचे समाधानही लाभले नाही. वानखेडे येथे झालेला तिसरा कसोटी सामना भारताने २५ धावांनी गमावला आणि मायदेशात प्रथमच तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-३ असे सपशेल अपयश पत्करण्याची नामुष्की भारतावर ओढवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेपूर्वी भारतीय संघ सलग १२ वर्षे मायदेशात वर्चस्व राखून होता. या काळात भारताने १८ कसोटी मालिकांमध्ये मिळून केवळ चार सामने गमावले होते. मात्र, आता फलंदाजांचे काही आश्चर्यकारक निर्णय आणि फिरकीपटूंपुढे त्यांची उडालेली दाणादाण, यामुळे भारताला एकाच मालिकेतील तीनही सामन्यांत हार पत्करावी लागली.

हेही वाचा >>>IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले

वानखेडेच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर पुन्हा एजाज पटेलच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. भारताला विजयासाठी १४७ धावांचे आव्हान मिळाले होते. याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासून गडी गमावले. एकवेळ ५ बाद २९ अशा स्थितीत भारतीय संघ सापडला होता. त्यावेळी डावखुऱ्या ऋषभ पंतने (५७ चेंडूंत ६४ धावा) झुंजार खेळी करताना भारताच्या आशा कायम राखल्या होत्या. मात्र, तो एजाजच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर भारताच्या आशा संपुष्टात आल्या. भारताचा डाव १२१ धावांतच आटोपला आणि न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय निश्चित झाला.

पहिल्या डावात पाच बळी मिळवणाऱ्या एजाजने दुसऱ्या डावात ५७ धावांत ६ गडी बाद केले. खेळपट्टीकडून चेंडूला उसळी मिळत होतीच, शिवाय तो चांगला वळतही होता. एजाजने फार प्रयोग न करता अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यास प्राधान्य दिले. पहिल्या दोन कसोटीप्रमाणेच या कसोटीतही भारताचा डाव गडगडला, फरक इतकाच की यावेळी भारताची तारांबळ दुसऱ्या डावात उडाली.

हेही वाचा >>>IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य

१४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच अडखळती झाली. कर्णधार रोहित शर्माला (११) पूलचा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि तो मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताच्या दुसऱ्या डावात हा एकच बळी वेगवान गोलंदाजाला मिळाला. यानंतर एजाजने शुभमन गिल (१) आणि विराट कोहली (१) या प्रमुख फलंदाजांना बाद करत भारताला अडचणीत टाकले. मग ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वाल (५) पायचीत झाल्याने भारताच्या अडचणी वाढल्या. मुंबईकर सर्फराज खान (१) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. एजाजच्या फुलटॉस चेंडूवर त्याने स्वीपचा फटका मारला आणि सीमारेषेवर उभ्या रचिन रवींद्रला झेल देत तो माघारी परतला. त्यामुळे भारताची ५ बाद २९ अशी स्थिती झाली.

पंतने मात्र आपले वेगळेपण सिद्ध करताना आव्हानात्मक खेळपट्टीवरही आक्रमक खेळ केला. त्याने फिरकीपटूंवर हल्ला चढवत भारताचा धावफलक हलता ठेवला. त्याला जडेजाची (१२) साथ लाभली. या दोघांनी ४२ धावांची भागीदारी रचल्यानंतर जडेजाचा अडसर एजाजने दूर केला आणि दुसऱ्या डावातही पाच बळी पूर्ण केले. यानंतर पंत आणि वॉशिंग्टन सुंदर (१२) यांची जोडी थोड्या वेळासाठी जमली होती. उपाहाराच्या विश्रांतीनंतर एजाजच्या गोलंदाजीवर पंत बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने २९ चेंडू खेळून काढले. मात्र, त्याचा संयम सुटला आणि त्याने फिलिप्सच्या गोलंदाजीवर रीव्हर्स स्वीप मारण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला. त्याला चेंडूशी संपर्क करता आला नाही आणि त्याने यष्टी गमावल्या. पुढच्याच चेंडूवर फिलिप्सने आकाशदीपला माघारी धाडले. अखेर फिलिप्सने वॉशिंग्टनला बाद करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा >>>IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित

त्याआधी, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने एजाजला बाद करत न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर संपुष्टात आणला. जडेजाने या डावात पाच बळी मिळवताना सामन्यात १० बळी पूर्ण केले.

पंतविरोधातील निर्णय प्रश्नांकित

एका बाजूने पडझड सुरू असताना दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतने शानदार खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, ६४ धावांवर त्याला एजाजने यष्टिरक्षक टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केले. सुरुवातीला मैदानावरील पंचांनी पंतला नाबाद ठरवले होते. चेंडू त्याच्या केवळ पॅडला लागून उडाल्याचे पंचांचे मत होते. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ‘रीव्ह्यू’चा वापर करत या निर्णयाविरोधात दाद मागितली. ‘रिप्ले’मध्ये चेंडू पंतच्या बॅटला लागला असे स्पष्टपणे दिसून येत नव्हते. मात्र, ‘स्निको मीटर’मध्ये दोन आवाज आल्याचे दिसल्याने पंचांनी पंतच्या पॅड आणि बॅट असे दोन्हीला चेंडू लागल्याचा निष्कर्ष काढला व त्याला बाद ठरवले. मात्र, पंत या निर्णयाबाबत नाराज होता. तसेच सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘‘तिसऱ्या पंचांना शंका असेल तर सहसा निर्णय मैदानावरील पंचांनी दिला आहे, तोच राहतो. इथे तो का बदलण्यात आला हे समजले नाही. सर्व संघांना समान न्याय आवश्यक आहे,’’ असे म्हटले.

वानखेडेवर एजाजच बादशाह

गेल्या (२०२१) भारत दौऱ्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्व १० गडी बाद करत क्रिकेटविश्वाला आपली ओळख करून देणाऱ्या न्यूझीलंडच्या एजाज पटेलने आपल्या फिरकीची जादू पुन्हा चालवली. त्या सामन्यात १४ बळी मिळवणाऱ्या एजाजने या वेळी ११ गडी बाद करण्याची किमया साधली. त्यामुळे वानखेडेवर पाहुण्या संघाकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम एजाजच्या नावे झाला आहे. या मैदानावरील दोन कसोटीत एजाजच्या नावे २५ बळी झाले असून त्याने इंग्लंडचे दिग्गज अष्टपैलू सर इयन बोथम (दोन कसोटीत २२ बळी) यांना मागे टाकले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The new zealand team defeated the indian team in the test match sport news amy