Saeed Ajmal on IND vs PAK clash in World Cup 2023: १५ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. विश्वचषकात होणाऱ्या या सामन्याची दोन्ही देशातील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना जगातील सर्वात मोठे मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी आतापासूनच पाकिस्तानने माइंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या यादीत आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलने मोठे वक्तव्य केले आहे. “पाकिस्तान संघ ही स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट आहे, असे त्याचे मत आहे. भारतीय गोलंदाजी पाकिस्तानी फलंदाजांना अजिबात आव्हान देऊ शकणार नाही”, असे अजमलला वाटते. भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचे विधान करत त्याने एकप्रकारे टीम इंडियाला डिवचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला सईद अजमल?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अजमल म्हणाला की, “भारताची गोलंदाजी पाकिस्तानइतकी धारदार कधीच नव्हती.” तो पुढे म्हणाला, “भारताची गोलंदाजी लाइनअप नेहमीच कमकुवत राहिली आहे. अलीकडच्या काळात फक्त मोहम्मद शमी आणि सिराजनेच चांगली गोलंदाजी केली आहे. फिरकीपटूंमध्ये मला वाटते की विश्वचषकात रवींद्र जडेजा महत्त्वाचा खेळाडू भारतासाठी आहे. जसप्रीत बुमराह पाकिस्तानसाठी धोका ठरू शकतो, पण तो बऱ्याच काळापासून अनफिट आहे. अशा स्थितीत भारताची गोलंदाजी पाकिस्तानसाठी फारशी धोक्याची ठरेल, असे मला वाटत नाही.”

हेही वाचा: IND vs PAK: “भारत-पाकिस्तान मॅचमध्ये ती गुणवत्ता राहिलेली नाही, इतर टीमसोबत…”, सौरव गांगुलीचे आश्चर्यचकित करणारे विधान

पाकिस्तानला जिंकण्याची ६० टक्के शक्यता

भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्याचे भाकीत करताना अजमलने सांगितले की, त्यांच्या संघाच्या विजयाची शक्यता ६० टक्के आहे. अजमल म्हणाला, “भारताची फलंदाजी नेहमीच मजबूत राहिली आहे. आमची गोलंदाजी मजबूत असल्याने आम्ही त्यांना मात देऊ शकतो, ही लढत बरोबरीची असेल. या क्षणी मी म्हणेन की पाकिस्तान जिंकण्याची ६०% शक्यता आहे. पाकिस्तान संघ विश्वचषक जिंकणारा फेव्हरेट संघ आहे. भारताची परिस्थिती आणि पाकिस्तानकडे असलेले गोलंदाज पाहता जर आमच्या संघाने भारताला कमी धावसंख्येपर्यंत रोखले तर पाकिस्तान नक्की जिंकेल.”

वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानचा सर्वात खराब रेकॉर्ड

जर वर्ल्डकपमधील विक्रमाबद्दल बोलायचे तर, पाकिस्तानला एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात भारताला पराभूत करता आलेले नाही. दोन्ही संघ एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि हे सर्व सामने भारताने जिंकले आहेत. २०१९च्या विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते तेव्हा भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने सामना ८९ धावांनी जिंकला होता. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने ५० षटकात ५ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने १४० आणि कर्णधार विराट कोहलीने ७७ धावा केल्या. के.एल. राहुलने ५७ धावा केल्या.

हेही वाचा: ENG vs AUS: “खेळभावना फक्त काय आम्हालाच…”, माजी खेळाडू गौतम गंभीर ऑस्ट्रेलियन संघावर भडकला

२०१९च्या विश्वचषकात पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव झाला होता

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ४० षटकांत ६ बाद २१२ धावाच करू शकला. फखर जमानने ६२ आणि बाबर आझमने ४८ धावा केल्या. इमाद वसीम ४६ धावा करून नाबाद राहिला. भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. एकूण रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, भारत-पाकिस्तान संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये १३२ वेळा भिडले आहेत. यापैकी भारताने ५५ सामने जिंकले असून पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. चार सामन्यांत निकाल लागला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no power in indias bowling there will be no threat in world cup 2023 pak cricketer saeed ajmal challenges team india avw