जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “पुढील वर्षी आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याबाबत आशियाई क्रिकेट बोर्ड (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांच्या वक्तव्यावर पीसीबीने आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. आशियाई क्रिकेट बोर्ड किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सल्लामसलत न करता हा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात याचे दीर्घकालीन परिणाम पाकिस्तान क्रिकेटवर होतील.” जय शाहांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानी माध्यमांमध्ये त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यावर आता भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी पाकिस्तानी माध्यमांना सडेतोड उत्तर दिले आहे.

टी२० विश्वचषक स्पर्धेच्या काही दिवस आधी, क्रिकेटच्या दृष्टीने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना मोठा फटका बसला कारण बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केले की भारतीय संघ आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानला जाणार नाही. त्यांच्या विधानाचा जोरदार निषेध करण्यात आला. सीमेपलीकडून पाकिस्तानच्या अनेक दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी यावर टीका केली. विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्यापूर्वी देखील यावर चर्चा बरीच झाली होती आणि सुनील गावसकर यांना एका पाकिस्तानी माध्यमाने विचारले होते की कोणतीही पूर्व सूचना न देत या विषयावर कुठलाही बैठक न करता शाहांच्या घोषणेमागील संभाव्य कारण काय असू शकते.

हेही वाचा :   “खड्ड्यात गेली खिलाडूवृत्ती,” हार्दिक पांड्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला “जर नियम आहे तर…”

आशिया चषकावर सुनील गावसकर म्हणाले.” मला वाटतं, कदाचित त्यांना ही बातमी त्यांच्या खास सूत्रांकडून मिळाली असावी, भारत सरकार परवानगी देणार की नाही देणार यासाठी अजून खूप वेळ आहे. माझ्या माहितीप्रमाणे  आशिया चषकासाठी अजून एक वर्ष बाकी आहे, त्यामुळे अशाप्रकारच्या काही आतल्या बातम्या त्यांना मिळाल्या असतील आणि त्यामुळेच त्याने हे विधान केले असावे.” आज तकच्या युट्युब चॅनलशी संवाद साधताना पाकिस्तानी माध्यमांना सुनील गावसकर यांनी यावर सडेतोड उत्तर दिले.

हेही वाचा :   IND Vs PAK Highlight: और इनको काश्मीर चाहिए; पाकिस्तानचा झेंडा भर मैदानात उलटा..Video झाला Viral

याआधी ही भारताचा कर्णधार रोहित शर्माने यावर उत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, “मी येथे टी२० विश्वचषक खेळण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे.” रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, “भारत पाकिस्तान दौरा करणार की नाही, या विषयावर सध्या बोलण्यात अर्थ नाही. बीसीसीआयला ते ठरवू द्या. मी येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकावर लक्ष केंद्रित करत आहे.”