रांची : यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीनंतरही मुंबईला रविवारी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. शुभम रोहिल्ला (११९ चेंडूंत १३५ धावा) आणि रवी चौहानच्या (१२० चेंडूंत १००) यांच्या द्विशतकी सलामीच्या जोरावर सेनादलाने मुंबईला आठ गडी राखून नमवले.
मुंबईने दिलेल्या २६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सेनादलाकडून रोहिल्ला आणि चौहान या सलामीवीरांनी २३१ धावांची भागीदारी रचत मुंबईच्या गोलंदाजांचे आक्रमण परतवून लावले. त्यामुळे सेनादलाने ४५.३ षटकांत २ बाद २६६ धावा करत विजय नोंदवला.त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पृथ्वी शॉ (५) माघारी परतल्यानंतर जैस्वालने (१२२ चेंडूंत १०४ धावा) कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (४३) साथीने संघाचा डाव सावरला. मात्र ठरावीक अंतराने गडी बाद झाल्याने मुंबईची ५ बाद १४२ अशी स्थिती झाली. जैस्वालने संघाची एक बाजू सांभाळत आपले शतक साजरे केले. त्याने आपल्या खेळीत १३ चौकार लगावले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत ९ बाद २६४ (यशस्वी जैस्वाल १०४, शम्स मुलानी ४८; दिवेश पठानिया ३/४८, अर्पित गुलेरिया २/४७) पराभूत वि. सेनादला : ४५.३ षटकांत २ बाद २६६ (शुभम रोहिल्ला १३५, रवी चौहान १००; रॉयस्टन डायस १/४७)