नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने नियुक्ती हंगामी समिती आता पुढील महिन्याच्या सुरुवातीला जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन केले आहे. सर्व मल्लांना ही चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीत विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना हार पत्करावी लागली, तर त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल असे हंगामी समितीच्या एका सदस्याने सांगितले.

बजरंग पुनिया (६५ किलो) आणि विनेश फोगट (५३ किलो) या दोघांनाही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश देण्यात आला आहे. अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे तयारीसाठी या दोघांनीही सरावासाठी वेळ मागितला होता. मात्र, आशियाई ऑलिम्पिक परिषदेने भारताला संघ पाठविण्यासाठी मुदत वाढवून देण्यास नकार दिला होता. यानंतर हंगामी समितीने निवड चाचणीचे आयोजन करताना बजरंग, विनेशला थेट प्रवेश देण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता.

बजरंग आणि विनेश यांना जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी घेण्यात येणाऱ्या निवड चाचणीत विजय मिळवावा लागेल. या चाचणीत ते पराभूत झाले, तर त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी देखील पाठवले जाऊ नये. असा नवा प्रस्ताव हंगामी समितीसमोर ठेवला असल्याचे समितीमधील एक सदस्य ग्यानसिंग यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.