Virat Kohli’s 66th ODI Half Century: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आपल्या कारकिर्दीत दररोज नवनवे विक्रम रचताना दिसत आहे. राजकोटमध्ये बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात किंग कोहली पुनरागमन केले. येथे त्याने आपल्या शानदार खेळीने पुन्हा एकदा करोडो क्रिकेटप्रेमींना आपलेसे केले. विराट कोहलीने ५ चौकार आणि १ षटकार मारत ६१ चेंडूत एकूण ५६ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यातील ६६ व्या अर्धशतकासह कोहलीने दोन महान खेळाडूंचे विक्रम मोडले.
विराट कोहली सर्वाधिक ५० हून अधिक धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज –
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. कोहलीच्या नावावर ११३ फिफ्टी प्लस धावा केल्या आहेत. रिकी पाँटिंगने ११२ वेळा पन्नास प्लस धावा केल्या होत्या. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर या बाबतीत आघाडीवर आहे. ज्याने १४५ वेळा फिफ्टी प्लस धावा केल्या आहेत. कोहली आता श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराच्या मागे आहे. संगकाराच्या नावावर ११८ वेळ फिफ्टी प्लस धावा आहेत.
व्हिव्ह रिचर्ड्सचाही मोडला विक्रम –
यासह कोहलीने वेस्ट इंडिजचा दिग्गज व्हिव्हियन रिचर्ड्सचा विक्रमही मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कोहली जगातील चौथा फलंदाज ठरला. त्याच्या नावावर २२२८ धावा आहेत. त्याने विव्ह रिचर्ड्सला मागे टाकले आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्सच्या नावावर २१८७ धावा आहेत. या बाबतीतही भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३०७७ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २३३२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कोहली आता वेस्ट इंडिजचा दिग्गज डेसमंड हेन्सच्या मागे आहे. ज्यांच्या नावावर २२६२ धावांची नोंद आहे.
हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला दिले सरप्राइज, आश्विन आणि विराटने मारली मिठी, पाहा VIDEO
टीम इंडियाला करता आली नाही विजयाची हॅट्ट्रिक –
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मोहम्मद सिराज बाद होणारा संघाचा शेवटचा फलंदाज होता. ५० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमरून ग्रीनकरवी त्याला कर्णधार पॅट कमिन्सने झेलबाद केले. सिराजने आठ चेंडूत एक धाव काढली. प्रसिद्ध कृष्णा खातेही न उघडता नाबाद राहिला.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. विराट कोहलीने ५६ धावांची आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. रवींद्र जडेजाने ३५ आणि केएल राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि 18 धावा करून बाद झाला.