Virat Kohli After Champions Trophy Victory: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत चार विकेट्सने विजय मिळवला.

या विजयानंतर, रोहित शर्मा भारताकडून दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा दुसरा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने २०२४ मध्ये बार्बाडोसमध्ये झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर भावना व्यक्त करताना, विराट कोहलीने ड्रेसिंग रूममधील एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आपली भूमिका मांडली.

शुभमन गिलच्या खांद्यावर हात ठेवून प्रसारकांशी बोलताना, कोहलीने भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्यावर भाष्य केले. विराटने संघातील तरुण आणि प्रतिभावान खेळाडूंवर प्रकाश टाकला. ज्यामुळे त्याच्या आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट चांगल्या खेळाडूंच्या हातात जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची त्याची सध्या कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी एक भक्कम संघ तयार असल्याचे पाहून त्याने समाधान व्यक्त केले.

जो पुढील ८-१० वर्षे जागतिक क्रिकेटवर…

“नक्कीच! मी शक्य तितके या खेळाडूंशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझ्या कारकिर्दीबाबत अनुभव त्यांच्याशी शेअर करतो. त्यांचा खेळ सुधारण्यासाठी मी जिथे शक्य असेल तिथे मदत करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही निवृत्ती घेण्याचा विचार करता त्यावेळी संघही चांगल्या स्थितीत असावा. त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफिच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर म्हणाला.

विराट कोहली पुढे म्हणाला की, “शेवटी, आम्ही जेव्हा निवृत्त होऊ, तेव्हा आमचा संघ असा असेल जो जगातील प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असेल, जो पुढील ८-१० वर्षे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार असेल. या खेळाडूंकडे ती क्षमता आहे.”

चॅम्पियन भारत

रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करून तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. या विजयासह भारताने १२ वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडच्या २५१ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्यांनंतर मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने नाबाद ३४ तर रवींद्र जडेजाने ९ धावा करत विजयी फटका मारला.

Story img Loader