India’s record at Wankhede Stadium : मुंबई ही भारतीय क्रिकेटची पंढरी. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला भले तो क्रिकेटप्रेमी असो वा नसो किमान एकदा तरी वानखेडे स्टेडियम बघण्याची इच्छा असतेच असते. क्रिकेटच्या पंढरीचे हे आनंदनिधान आहे. या स्टेडियमवर प्रत्यक्ष सामना बघण्याची संधी मिळालेले क्रिकेट रसिक स्वतःला धन्य मानतात. सामन्याच्या दिवशी फुलून येणारा चर्चगेट स्थानकाचा परिसर, स्टेडियमचे दूरवरून दिसणारे प्रकाशझोत क्रिकेट चाहत्यांना स्टेडियमकडे आकर्षित करतात. मुंबई क्रिकेट संघटनेच्या या वानखेडे स्टेडियमचा सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला रविवारी १२ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या स्टेडियमवरील भारतीय संघाचा रेकॉर्ड कसा आहे, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा कसोटी रेकॉर्ड –

१९७५ पासून वानखेडे स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकूण २७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी १२ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ८ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. याशिवाय ७ कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारताने या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या इंग्लंडविरुद्ध नोंदवली आहे. ८ डिसेंबर २०१६ रोजी पार पडलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३६ धावांनी पराभ केला होता. या सामन्यात भारताने १० बाद ६३१ धावा केल्या होत्या. भारताने या मैदानाावरील आपला शेवटचा सामना १ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यूझीलंविरुद्ध खेळला होता. ज्यामध्ये न्यूझीलंडने २५ धावांनी विजय मिळवला होता. या मैदानावर सर्वाधिक धावा सुनील गावस्करने (११२२) केल्या आहेत. सर्वाधिक विकेट्स रविचंद्रने अश्विनने घेतल्या आहेत.

भारताचा वनडे रेकॉर्ड –

भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत २१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ‘मेन इन ब्लू’ संघाने १२ जिंकले आहेत आणि ९ गमावले आहेत. या मैदानावर भारताने पहिला सामना १७ जानेवारी १९८७ मध्ये खेळला होता. ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा १० धावांनी पराभूत केले होते. त्याचबरोबर शेवटचा सामना १५ नोव्हेंबर रोजी २०२३ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हा सामना भारताने ७० धावांनी जिंकला होता. या मैदानावर सर्वाधिक वनडे धावा विराट कोहलीने (४७४) केल्या आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीने (१५) घेतल्या आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुरु केला सराव, मुंबईतील बीकेसीत धावतानाचा VIDEO व्हायरल

भारताचा टी-२० रेकॉर्ड –

भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एकूण ५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच उर्वरित दोन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. भारताने या मैदाना पहिला टी-२० सामना २२ डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळवला होता. ज्यामध्ये इंग्लंडने भारताला ६ विकेट्सनी पराभूत केले होते. या मैदानावरचा शेवटचा सामना श्रीलंका आणि भारत यांच्यात ३ जानेवारी २०२३ मध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने २ धावांनी विजय मिळवला होता. या मैदानावरील भारताची सर्वोच्च धावसंख्या २४० धावा आहे, जी वेस्ट इंडिजविरुद्ध ११ डिसेंबर २०१९ मध्ये उभारली होती. हा सामना भारताने ६७ धावांनी जिंकला होता. या मैदानवर सर्वाधिक धावा विराट कोहलीने (१९७) केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wankhede stadium team india odi t20 and test records at mumbai vbm