India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. भारताच्या पराभवाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले, फायनलपूर्वी सर्वांनी भारताला विश्वविजेता असे भाकीत वर्तवले होते पण ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. याशिवाय फलंदाजीत ट्रॅविस हेड आणि लाबुशेन यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. ट्रॅविस हेडला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारताच्या पराभवाने केवळ चाहतेच नाही तर माजी दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने नाणेफेकबाबत मोठे विधान केले आणि नाणेफेक गमावणे भारताचे दुर्दैव असल्याचे मान्य केले. वसीम म्हणाला की, “फायनलसारख्या सामन्यांमध्ये नाणेफेक महत्त्वाची ठरणे हे मोठ्या सामन्यांसाठी चांगले नाही.”

‘ए’स्पोर्ट्सशी बोलताना वसीम म्हणाला, “दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामन्यात समान संधी मिळायला हवी. नाणेफेकीवर खेळाचा निर्णय घेतला जाऊ नये. मला माहीत आहे की, आजच्या काळात दिवस-रात्र सामन्याला जास्त महत्व दिले जाते कारण, चाहते मोठ्या प्रमाणावर स्टेडियममध्ये येतील. टीव्ही टेलिकास्ट करणाऱ्यांना यामुळे अधिक फायदा होईल. जास्तीत जास्त लोक टीव्हीवर सामना बघतील आणि प्रेक्षकसंख्या वाढेल. मात्र, यामुळे दीड महिना कष्ट करणाऱ्या संघावर अन्याय होतो हे पण लक्षात घेणे महत्वाचे आहे. भारताने संपूर्ण विश्वचषकात चांगली कामगिरी केली. शेवटच्या सामन्यासाठी दव हा मोठा घटक ठरणे हे दोन्ही संघासाठी तितकेच अन्यायकारक आहे आणि तो अन्याय भारतावर झाला. एवढा खेळ केल्यावर सामन्यामध्ये नाणेफेक महत्त्वाचा ठरला.”

वसीम अक्रम पुढे म्हणाला की, “जर आशिया खंडातील देशात जर नाणेफेक महत्वाची ठरत असेल तर मग दोन्ही संघांसाठी ही समस्या असेल. यामुळे क्रिकेट आणि पर्यायाने पराभूत होणाऱ्या संघाचे हे खूप मोठे नुकसान आहे. तुम्ही खूप मेहनत करून अंतिम फेरीत पोहोचला आहात त्यामुळे तुम्हाला समान संधी मिळायला हवी होती. अशावेळी तुम्ही सामना दिवस-रात्र ठेवण्याऐवजी दिवसा सामना करायला हवा होता.”

हेही वाचा: IND vs AUS Final: “मी निराश झालोय पण लाजिरवाणी गोष्ट…”, सुनील गावसकरांचं टीम इंडियाबाबत मोठे विधान

याशिवाय वसीमने असेही सांगितले की, “जर दव पडण्याची समस्या असेल तर तुम्ही दिवसाचे सामने आयोजित केले पाहिजेत किंवा स्टेडियम झाकण्याचा विचार करा. जर दोन्ही संघांना समान संधी द्यायची असेल तर काहीतरी यापुढे आयसीसीला करावे लागेल.” त्याचवेळी अक्रम म्हणाला की, “उपांत्य फेरीऐवजी प्ले-ऑफ स्पर्धा आयोजित करण्याचा विचार आयसीसीने करायला हवा. कारण, जर एक वाईट दिवस आला तर सर्वोत्कृष्ट संघ स्पर्धेबाहेर होतो. मला वाटतं आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे, प्लेऑफचे आयोजन केले पाहिजे.”

याबरोबरच वसीम म्हणाला, “हे बघा, इथे नाणेफेक फार महत्त्वाची नसते पण रात्री दव पडण्याची समस्या नक्कीच असते. म्हणूनच मी म्हणत होतो की, जेव्हा मोठे सामने असतात तेव्हा दिवसाचे सामने व्हायला हवेत. या सामन्यात उत्तार्धात खेळणाऱ्या संघासाठी फलंदाजी सोपी झाली. रात्री खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली झाली होती. म्हणूनच मी म्हणत होतो की, दोन्ही संघांना समान संधी मिळायला हव्यात.”

अंतिम फेरीत भारताने प्रथम फलंदाजी करत २४० धावा केल्या होत्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅविस हेडने १३७ धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवून दिले. भारताकडून रोहितने ४७ धावा, विराटने ५४ धावा आणि के.एल. राहुलने ६६ धावा केल्या, पण संघाची धावसंख्या ३०० पर्यंत नेऊ शकला नाही. अंतिम फेरीत भारतीय फिरकीपटूही अपयशी ठरले. कुलदीप आणि जडेजा विकेट घेऊ शकले नाहीत, तर दुसरीकडे बुमराहला केवळ २, शमी आणि सिराजला प्रत्येकी एकच विकेट घेता आली.

Story img Loader