Shubman Gill’s reaction on Team India’s win : टीम इंडियाने हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात झालेल्या पहिल्या पराभवाचा बदला घेतला. पहिल्या टी-२० सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली. टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी करत २० षटकांत २ गडी गमावून २३४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १८.४ षटकांत केवळ १३४ धावाच करू शकला. ज्यामुळे भारतीय संघाने १०० धावांनी सामना जिंकला. या शानदार विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल खूप आनंदी दिसत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालपर्यंत दबाव सहन करू शकलो नव्हतो –

सामन्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “आज मी खूप आनंदी आहे. टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिकेत केलेले पुनरागमन अप्रतिम आहे. आज पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करणे सोपे नव्हते. पॉवरप्लेमध्ये चेंडू इकडे तिकडे फिरत होता, पण ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते कौतुकास्पद आहे. कालपर्यंत आमचा युवा संघ दडपण सहन करू शकला नव्हता. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू नवीन आहेत, पण आज संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती.”

‘आज काय होणार आहे हे आम्हाला आधीच माहीत होतं’ –

शुबमन गिल पुढे म्हणाला, “माझ्या मते पहिल्या सामन्यात दबाव असणे नक्कीच चांगले होते. आम्हाला माहित होतं की आज काय होणार आहे. मला आशा आहे की आगामी सामन्यांमध्ये फलंदाज अशीच कामगिरी करतील. आम्हाला अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि आम्ही त्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत.” हरारे येथे भारताचा १०० धावांनी विजय हा टीम इंडियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाने २२९/२ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs ZIM 2nd T20I : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय, १०० धावांनी उडवला धुव्वा

अभिषेक शर्माने शतक झळकावले –

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली. अभिषेकने ४७ चेंडूंत सात चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. भारतासाठी अभिषेकचे हे पहिले शतक आहे. शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शून्यावर बाद झाला होता. यासह अभिषेक झिम्बाब्वे विरुद्ध टी-२० मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, तसेच तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी डावात शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We already knew what was going to happen today shubman gill reacts after the win against zimbabwe vbm
Show comments