भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने शनिवारी त्याच्या २०११ च्या विश्वचषक विजेत्या आठवणींना उजाळा दिला आणि म्हणाला की संपूर्ण देशासाठी आणि सचिन तेंडुलकरसाठी चषक जिंकू इच्छिणाऱ्या संघाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आजच्या दिवशी भारताने २०११ साली आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकून ११ वर्षे पूर्ण केली.२०११ चा विश्वचषक युवराजसाठी संस्मरणीय होता कारण त्याने ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ विकेट घेतल्या होत्या आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरवण्यात आले होते. टीम इंडियासाठी युवराज सिंग हा स्टार परफॉर्मर होता ज्याने आपल्या उच्च प्रभावशाली कामगिरीने भारतीयांच्या हृदयावर आणि मनावर कब्जा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या मुंबईत झालेल्या शिखर लढतीत श्रीलंकेचा पराभव करून २८ वर्षानंतर विजेतेपद पटकावले. युवराजने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महान क्षणाची आठवण करून दिली आणि चषक मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला समर्पित केला.

“हा फक्त विश्वचषक विजय नव्हता – हे एक अब्ज भारतीयांचे पूर्ण करायचं स्वप्न होत. मला या संघाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे ज्याला संपूर्ण देशासाठी आणि अतिशय खास व्यक्ती @sachintendulkar साठी चषक जिंकायचा होता. तिरंगा परिधान करून देशाला गौरव मिळवून देण्याच्या अभिमानाची बरोबरी कशासोबतच होऊ शकत नाही.” त्यांने लिहिले.

(हे ही वाचा: On This Day: एमएस धोनीचा ‘तो’ जोरदार षटकार आणि आजच्याच दिवशी भारताला मिळालेला दुसरा विश्वचषक!)

तत्पूर्वी, युवराज म्हणाला होता की संपूर्ण संघाला विश्वचषक जिंकायचाच होता, विशेषत: सचिनसाठी, कारण त्यांना माहित होते की हा त्याचा शेवटचा विश्वचषक आहे.

भारताने श्रीलंकेला २७४ धावांवर रोखले आणि त्यानंतर १० चेंडू शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला. भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला आणि पुन्हा प्रतिष्ठित विजेतेपद मिळविण्यासाठी २८ वर्षे वाट पहावी लागली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We wanted to win it for sachin tendulkar spicail post by yuvraj singh recalls 2011 world cup win ttg