चार वर्षानंतर होणारा वर्ल्डकप ही क्रिकेटजगतातली मोठी घटना असते. वर्ल्डकप फायनल या सोहळ्याचा मानबिंदू. विश्वविजेता संघ कोणता हे या लढतीतून स्पष्ट होतं. पण ही लढत अंधारात खेळवली गेल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? असं झालंय खरं. २००७ मध्ये वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आला होता. वर्ल्डकपमध्ये नेहमीच दमदार प्रदर्शन करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ फायनलमध्ये पोहोचला. दुसरीकडे सातत्यपूर्ण कामगिरी करत श्रीलंकेने अंतिम फेरी गाठली. हा मुकाबला चुरशीचा होणार याची क्रिकेटरसिकांना खात्री होती. पण झालं भलतंच. हा मुकाबला नाट्यमय, वादग्रस्त आणि नामुष्की ओढवणारा ठरला. या लढतीने आयसीसीच्या आयोजनातील ढिसाळपणा चव्हाट्यावर आला.
पावसामुळे फायनल प्रत्येकी ३८ षटकांची असेल असं ठरलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध अॅडम गिलख्रिस्टने १३ चौकार आणि ८ षटकारांसह १०४ चेंडूत १४९ धावांची अद्भुत खेळी साकारली. गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन जोडीने १७२ धावांची सलामी दिली. हेडनने ३८, कर्णधार रिकी पॉन्टिंगने ३७ धावा करत गिलख्रिस्टला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने २८१ धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सनथ जयसूर्या (६३) आणि कुमार संगकारा (५४) यांनी झुंज दिली. पण ही जोडी बाद झाल्यानंतर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली. तीन षटकांचा खेळ बाकी असताना श्रीलंकेला ६० धावांची आवश्यकता होती. विजय ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिक्षेपात होता. पण तोपर्यंत अंधार पसरला होता. खेळ सुरू ठेवता येईल एवढा उजेड नसल्याने दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये परतले.
आणखी वाचा: World Cup Cricket : पेटलेलं इडन गार्डन्स आणि ओक्साबोक्शी रडणारा विनोद कांबळी
ऑस्ट्रेलियाचा विजय आणि श्रीलंकेचा पराभव ही निव्वळ औपचारिकता उरली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयाचा जल्लोष सुरू केला. दुसरी इनिंग्ज मानण्यासाठी आवश्यक २० षटकांचा खेळही झाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित केलं जाईल असं वाटत असतानाच पंचांनी नियमांवर बोट ठेवत उर्वरित तीन षटकांचा खेळ उद्या म्हणजे राखीव दिवशी होईल असं सांगितलं.
श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी पंचांशी चर्चा केली. तीन षटकांचा खेळ होणं आवश्यक असल्याचं पंचांनी स्पष्ट केलं. अखेर अंधारात ती षटकं त्याच दिवशी खेळवण्यात येतील असं ठरलं. ऑस्ट्रेलियातर्फे फिरकीपटूंनी गोलंदाजी केली. मैदानावर फारसे प्रेक्षकही उरले नव्हते. पराभव अटळ असल्याने श्रीलंकेच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर खिन्नता होती. दुसरीकडे विनाकारण तीन षटकांसाठी पुन्हा खेळायला उतरावं लागल्याने ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही नाराज होते. तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा जल्लोष टिपण्यापुरता उजेडही नव्हता. ऑस्ट्रेलियाने ५३ धावांनी विजय मिळवला. अॅडम गिलख्रिस्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता
इतक्या मोठ्या स्पर्धेची सांगता केविलवाण्या पद्धतीने झाली. फायनलसाठी अलीम दार आणि स्टीव्ह बकनर यांच्यासह रुडी कोर्टझन पंच होते. जेफ क्रो सामनाधिकारी होते. अंधारात खेळवण्यात आलेल्या तीन षटकांवरून आयसीसीवर प्रचंड टीका झाली. अशी खेळाची थट्टा करण्याची काहीच गरज नव्हती असा माजी खेळाडूंचा सूर होता. पाऊस किंवा अंधुक प्रकाशामुळे बाधित सामन्यांचे नेमके नियम काय यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले.